
मुळशी ः निसर्गचक्रीवादळाचा मुळशी तालुक्याला मोठा फटका बसला आहे.
मुळशी ः निसर्गचक्रीवादळाचा मुळशी तालुक्याला मोठा फटका बसला आहे. मुळशी धरणाच्यावरील भागातील सर्वात मोठे गाव असणारे भांबर्डे गावाला या चक्रीवादळाचा सर्वाधिक नुकसान झाले आहे. भांबर्डे, गावठाण, रामवाडी, आंबेडकरनगर, एकोले, आडगाव, तैलबैले या गावातील वादळात सर्वच घरांचे पत्रे उडून गेले असून घरांची पडझड झाली आहे. एकट्या भांबर्डे गावात १८४ कुटुंब या पावसाने बाधित झाली आहेत. वादळासोबत आलेल्या पावसाने घरात ठेवलेले धान्य, लाकडूफाटा, जनावरांचा पेंडा देखील भिजलेला आहे. बुधवारी आलेल्या चक्रीवादळानंतर अवघ्या १२ ते २ या दोन तासातच होत्याचे नव्हते झाले. वेगाने वाहणारा वारा आणि पाऊस याच्यामुळे भांबर्डे आणि एकोेले गावातील सर्वच घरांचे पत्र उडून गेले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र पावसाळ्यासाठीची बेगमी म्हणून घरात जमा केलेले धान्य आणि इतर साहित्य पावसात भिजले. घरांचे पत्र उडाल्याने लोकांनी गावातील शाळेत आश्रय घेतला मात्र काही वेळाने शाळेची ही पत्रे उडून गेली. प्रशासनाच्यावतीने गावकऱ्यांची व्यवस्था गावातील मंदिरामध्ये करण्यात आली असल्याचे तलाठी गणेश पोतदार यांनी सांगितले.