द्राक्ष बागायत दारांचे कोट्यावधीचे नुकसान

भिगवण : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर द्राक्ष बागायत दारांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले असुन इंदापूर तालुक्यातील अडिच हजार हेक्टर वरील द्राक्ष मातीमोल झाल्याने द्राक्ष बागायतदार हवालदिल झाले आहेत.

 शासनाने द्राक्ष बागायतदारांना मदत करण्याची मागणी

भिगवण :   कोरोनाच्या पार्श्वभूमीवर द्राक्ष बागायत दारांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले असुन इंदापूर तालुक्यातील अडिच हजार हेक्टर वरील द्राक्ष मातीमोल झाल्याने द्राक्ष बागायतदार हवालदिल झाले आहेत. तोड्याला आलेली द्राक्ष बागेतच सडुन जात आहे किंवा वाहतूक खर्चात विकावी लागत असल्याने शेतकऱ्यांच्यावर कर्जाचा बोजा वाढणार आहे. यामुळे शासनाने द्राक्ष बागायतदारांना मदत करावी. यासाठी विधानसभेत मुद्दा उपस्थित करणार असल्याचे मोहोळचे आमदार यशवंत माने यांनी सांगितले.
        द्राक्षांच्या पासुन वाईन, मनुके, पल्प मोठ्या प्रमाणात बनवले जातात मात्र कारखाने बंद असल्याने वाईन निर्मितीला जाणारी द्राक्ष बंद झाली तर शेतकऱ्यांच्याकडे बेदाणे बनवण्यासाठी लागणारे शेड उपलब्ध नसल्याने ओली द्राक्ष बागेतच सडत आहे. तर बोटावर मोजण्या एवढ्या शेतकऱ्यांनी वाहतुक खर्चात द्राक्ष घरपोच विकण्याचा फंडा काढला आहे. मात्र बुडत्याला काढीचा आधार अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे.
        इंदापूर आणि मोहोळ तालुक्यात मोठ्याप्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. इंदापूर तालुक्यात बोरी भागात मोठ्या प्रमाणात द्राक्ष बागा आहेत. यावर्षी तालुक्यात दोन हजार पाचशे हेक्टर द्राक्ष लागवड करण्यात आली आहे. केळी एक हजार हेक्टरवर लागवड करण्यात आली होती. द्राक्ष बागायतदारांना एकरी पन्नास हजार रुपये खर्च येतो तर केळी बागायतदारांना चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपये खर्च येतो कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेला खर्च वाया गेला आहे या बरोबरच एक वर्ष केलेले कष्ट आणि विज बिल भरावे लागणार असल्याने शेतकऱ्यांचे पुरते कंबरडे मोडले आहे तालुक्यातील दुष्काळी भागात शेतकऱ्यांनी शेततळ्यांच्या पाण्यावर द्राक्ष पिक घेतले आहे यामुळे कर्जाचा बोजा वाढणार आहे या विवंचनेत शेतकरी असल्याने शासनाला मदत करण्याची मागणी करणार असल्याचे आमदार यशवंत माने यांनी सांगितले.
         द्राक्ष बागायतदारांना अवकाळी पाउस, हवामानातील बदल बाजार भावाचा चढ उतार सहन करावा लागत असतानाच आता कोरोनाच्या संकटाने द्राक्ष बागायतदारांचे कंबरडे मोडले आहे. राज्यातील द्राक्ष उत्पादनात इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा मोठा सहभाग आहे. राज्यातील नाशिक पाठोपाठ इंदापूरचे शेतकरी अधिकची द्राक्ष उत्पादित करत आहेत. मात्र वेळोवेळी येणाऱ्या संकटाने द्राक्ष बागायतदार पुरता कोलमडला आहे. यामुळे शेतकऱ्यांना मदत करावी अशी भूमिका घेणार असल्याचे आमदार यशवंत माने यांनी सांगितले.