खेड पंचायत समितीचे सभापती भगवान पोखरकर यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर

पंचायत समिती मध्ये शिवसेनेकडे स्पष्ट बहुमत असताना देखील अविश्वास ठराव संमत झाला. यामुळे पक्षातील गटबाजी उघड झाली. माजी खासदार शिवाजी आढळराव परिस्थिती हाताळण्यात अयशस्वी ठरले, अशी चर्चा तालुक्यात होत आहे. यावेळी पंचायत समितीच्या पाचशे मीटर परीसरात संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले होते.

    राजगुरूनगर : खेड पंचायत समितीचे सभापती भगवान पोखरकर यांच्या विरोधात ११ विरुद्ध ३ याप्रमाणे अविश्वास ठराव मंजूर झाला, अशी माहिती पीठासीन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी विक्रांत चव्हाण यांनी दिली. १४ पैकी ११ पंचायत समितीच्या सदस्यांनी दाखल केलेल्या अविश्वास ठरावाविरोधात सोमवारी (दि. ३१) विशेष सभा बोलावण्यात आली होती.
    खेड पंचायत समितीच्या १४ सदस्यांपैकी शिवसेनेच्या भगवान पोखरकर व ज्योती अरगडे आणि काँग्रेसचे सदस्य अमोल पवार यांनी अविश्वास ठरावाच्या विरोधात तर शिवसेनेच्या सुनिता सांडभोर, वैशाली जाधव, सुभद्रा शिंदे, मच्छिंद्र गावडे, अमर कांबळे, अंकुश राक्षे आणि राष्ट्रवादीचे अरुण चौधरी, मंदा शिंदे, वैशाली गव्हाणे, नंदा सुकाळे व भाजपाचे विद्यमान उपसभापती चांगदेव शिवेकर अशा ११ सदस्यांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने कौल दिला.
    पोखरकर यांच्याविरोधात पुण्यातील एका रिसाँर्टवर हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक झाली होती. मात्र अविश्वास ठरवाच्या मतदानास येण्याची मुभा सभापती पोखरकर यांना न्यायालयाकडून देण्यात आली होती. त्यानुसार पोखरकर हे पोलीस बंदोबस्तात सभेसाठी आले होते. याच पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडु नये यासाठी पोलिसांनी राजगुरुनगर मध्ये तगडा बंदोबस्त ठेवला होता.
    “मी पंचायत समिती ईमारत बांधकामाबाबत आमदार दिलीप मोहिते यांच्या विरोधात भूमिका घेतल्याने त्यांनी हे षडयंत्र रचले, असा आरोप सभापती भगवान पोखरकर यांनी केला. या मतदान प्रक्रियेदरम्यान सुभद्रा शिंदे व मच्छिंद्र गावडे या सदस्यांनी सुरवातीला हात वर केले नव्हते. ईतर सदस्यांनी सांगितल्यावर त्यांनी हात वर केला, त्यामुळे आम्ही उच्च न्यायालयात आव्हान देणार आहोत”, असे काँग्रेस सदस्य अमोल पवार यांनी सांगितले. स्व. आमदार सुरेश गोरे यांच्या स्वप्नांना ईतर सदस्यांनी सुरुंग लावला असा आरोप करताना ज्योती आरगडे यांनी अश्रू अनावर झाले.
    सभापती पोखरकर हे ३१ डिसेंबर २०२० रोजीच राजीनामा देणार होते. त्यांनी शब्द पाळाला असता तर ही वेळ आलीच नसती असे मत शिवसेनेच्या सुनिता सांडभोर यांनी व्यक्त केले. सभापती पोखरकर हे कामकाजात महिलांना विश्वासात घेत नव्हते. कायम अरेरावीची भाषा वापरत. पत्रकार परिषदेत आढळराव यांनी आमची बाजू घेतली नाही, अशी खंत शिवसेनेच्या वैशाली जाधव यांनी व्यक्त केली. पोखरकर हे ईमारत बांधकामाचा बागलबुवा करीत आहेत. ईमारत ही ठरल्या जागेवर व्हावी, हीच आम्हा सर्वांची ईच्छा आहे. काम करण्यासाठी पद हवेच, असे काही नसते. पोखरकर यांनी रिसॉर्टमध्ये महिला सदस्यांना बाथरूममध्ये घुसून मारहाण केली. ही स्वर्गीय आमदार सुरेश गोरे यांची संस्कृती नव्हती. या सर्व प्रक्रियेत आमची प्रतिमा मलिन झाली, अशी शिवसेना सदस्य अंकुश राक्षे यांनी प्रतिक्रिया दिली.
    दरम्यान,  पंचायत समिती मध्ये शिवसेनेकडे स्पष्ट बहुमत असताना देखील अविश्वास ठराव संमत झाला. यामुळे पक्षातील गटबाजी उघड झाली. माजी खासदार शिवाजी आढळराव परिस्थिती हाताळण्यात अयशस्वी ठरले, अशी चर्चा तालुक्यात होत आहे. यावेळी पंचायत समितीच्या पाचशे मीटर परीसरात संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले होते. त्यामुळे राजगुरूनगरवासीयांना वाहतूक समस्येला सामोरे जावे लागले.