खेड तालुका विकासाच्या ट्रॅकवर आणण्यासाठी पुणे नाशिक रेल्वे आवश्यक  ; खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे आढावा बैठकीत प्रतिपादन

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सकारात्मक संवाद साधल्याने प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा विरोध मवाळ झाला आहे. मोजणी केल्यानंतर तपशीलवार माहिती उपलब्ध होईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी मोजणीसाठी सहकार्याची भूमिका घेतली आहे. खेड तालुक्यातील २२ गावांतून लोहमार्ग जात असून अनेक ठिकाणी संवाद बैठका पार पडल्या आहेत. काही गावांतील मोजणी पूर्ण झाली आहे. बहुप्रतिक्षित रेल्वे प्रकल्प शेवटच्या टप्प्यात आल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

    राजगुरूनगर : शिरूर लोकसभा मतदारसंघाचा कायापालट करणाऱ्या प्रस्तावित पुणे – नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर खेड तालुक्यातील भूसंपादन प्रक्रियेचा खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आढावा घेतला.

    शनिवारी (दि. १२) येथील शासकीय विश्रामगृहात कोल्हे यांनी मरकळ, होलेवाडी, मांजरेवाडी भागातील प्रतिनिधींशी संवाद साधला. याप्रसंगी खेड उपविभागीय अधिकारी विक्रांत चव्हाण, तहसीलदार वैशाली वाघमारे, महारेलचे सहमहाव्यवस्थापक सुनील हवालदार, उपमहाव्यवस्थापक एस. आर. शिरोळे, महारेलच्या भूसंपादन विभागाचे व्यवस्थापकीय अधिकारी जयंत पिंपळकर, मंदार विचारे, चंद्रकिशोर भोर, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष कैलास सांडभोर, मार्केट कमिटी माजी सभापती नवनाथ होले, विलास कातोरे, बाळशेठ ठाकूर आदी उपस्थित होते.

    या आढावा बैठकीत कोल्हे यांनी शेतकऱ्यांना कशाप्रकारे नुकसान भरपाई दिली जाणार आहे याची माहिती घेतली. तसेच भूसंपादनामुळे किती शेतकरी अल्पभूधारक व भूमीहिन होत आहेत याची संपूर्ण माहिती देण्याच्या सूचना प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण यांना दिल्या. या माहितीच्या आधारे अल्पभूधारक व भूमिहिन शेतकऱ्यांसाठी काय विशेष प्रयत्न करता येईल याचा अभ्यास करण्याचे डॉ. कोल्हे यांनी अधिकाऱ्यांना सुचविले.

    बैठकीत मार्गदर्शन करताना कोल्हे म्हणाले की काही वर्षांपूर्वी प्रस्तावित विमानतळ खेड तालुक्याबाहेर गेल्याने इथला विकास खुंटला आहे. त्यामुळे त्याची काही प्रमाणात भरपाई करुन तालुका विकासाच्या ट्रॅकवर आणण्यासाठी पुणे – नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प आवश्यक आहे. त्यामुळे विरोध करुन संधी दवडली जाता कामा नये. शेतकऱ्यांच्या शंकांचे पूर्ण समाधान करा, अशा सूचना संबंधितांना दिल्या आहेत.

    खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सकारात्मक संवाद साधल्याने प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा विरोध मवाळ झाला आहे. मोजणी केल्यानंतर तपशीलवार माहिती उपलब्ध होईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी मोजणीसाठी सहकार्याची भूमिका घेतली आहे. खेड तालुक्यातील २२ गावांतून लोहमार्ग जात असून अनेक ठिकाणी संवाद बैठका पार पडल्या आहेत. काही गावांतील मोजणी पूर्ण झाली आहे. बहुप्रतिक्षित रेल्वे प्रकल्प शेवटच्या टप्प्यात आल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.