पुणे-सातारा जिल्ह्याच्या सीमा खुल्या करण्याची मागणी बारामती : नीरा खोऱ्यातील सोमेश्‍वर, माळेगाव आणि छत्रपती या तिन्ही कारखान्याचा आडसाली ऊस लागवड हंगाम जवळ येत असल्याने ऊसबेणे वाहतूक तसेच

पुणे-सातारा जिल्ह्याच्या सीमा खुल्या करण्याची मागणी
 बारामती :
नीरा खोऱ्यातील सोमेश्‍वर, माळेगाव आणि छत्रपती या तिन्ही कारखान्याचा आडसाली ऊस लागवड हंगाम जवळ येत असल्याने ऊसबेणे वाहतूक तसेच शेतीच्या इतर कामासाठी पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या बंद केलेल्या सीमा खुल्या कराव्यात, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

सोमेश्‍वर, माळेगाव आणि छत्रपती या तिन्ही कारखान्याचा आडसाली ऊस हंगाम दि. 1 ते दि. १५ जुलैच्या दरम्यान असतो, तसेच हे तिन्ही साखर कारखाने पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या सीमेवर नीरा नदी असल्याने या कारखान्याचे कार्यक्षेत्र पुणे जिल्ह्यातील अनेक तालुक्‍यासह सातारा जिल्ह्यातील अनेक तालुक्‍यांमधून आहे.

बारामती तालुक्‍यातील सोमेश्‍वर साखर कारखान्याचे कार्यक्षम हे जिल्ह्यातील बारामती आणि पुरंदर तर सातारा जिल्ह्यातील फलटण आणि खंडाळा तालुक्‍यात देखील असल्याने ऊस लागवड हंगामात दोन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांची शेतीची वाहने तसेच ऊस बेणे ची घेवाण देवाण होत असते.

मात्र, करोनाच्या पार्श्‍वभूमीवर सीमा बंद केल्या असल्याने या दोन जिल्ह्यातील शेतकऱ्यांची शेतीविषयक कामांची घेवाण-देवाण बंद झाली आहे. दरम्यान, दोन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बेण्यची खरेदी करून ठेवली आहे; मात्र जिल्हा बंदी असल्याने उसाचे बेणे कसे आणणार या चिंतेने बळीराजाला ग्रासले आहे.विचारात शेतकरी पडला आहे.
फलटण तालुक्‍यात पाडेगाव या ठिकाणी ऊस संशोधन केंद्र असून अनेक शेतकरी या ठिकानावरूनही उसाच्या बेण्याची खरेदी करत असतात; मात्र सीमा बंदीमुळे शेतकऱ्यांना शेतीच्या कामाला अडचणी होत असल्याने पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या नीरा नदीवरील बंद केलेल्या सीमेवरील बंधारे आणि पूल काही काळासाठी खुले करावेत, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
अजित पवारांना दिली माहिती
आम्ही अनेक शेतकऱ्यांनी सातारा जिल्ह्यात ऊस बेणे घेतले असून सीमा बंद असल्याने आम्ही उसाचे बेणे आणू शकत नाही, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोनवरून दिली. त्यावर पवार म्हणाले की, फलटणचे तहसीलदार पाटील यांना भेटा त्यांच्याशी मी बोलून घेतो, असे त्यांनी सांगितल्याचे मुरूम ग्रामपंचायतीचे माजी सरपंच प्रदीप कणसे यांनी सांगितले.