पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास ३ मे पर्यंत प्रतिबंध

कोल्हापूर : राज्य शासनाने कोरोना विषाणूचा (कोव्हिड-१९) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ दिनांक १३ मार्च २०२० पासून लागू करून खंड २, ३ व ४ मधील तरतूदीनुसार अधिसूचना निर्गमित केली आहे.

 कोल्हापूर : राज्य शासनाने कोरोना विषाणूचा (कोव्हिड-१९) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ दिनांक १३ मार्च २०२० पासून लागू करून खंड २, ३ व ४ मधील तरतूदीनुसार अधिसूचना निर्गमित केली आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्याकरिता त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाकडील दि. १४ एप्रिल २०२० च्या आदेशान्वये पाच किंवा पाच पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली होती. सदर आदेशाचा कालावधी दि. ३० एप्रिल २०२० पर्यंत निर्गमित करण्यात आला होता.

-सोशल डिस्टन्सिंग पाळणे बंधनकारक

महाराष्ट्र शासनाच्या दि.१५ एप्रिल २०२०च्या आदेशानुसार लॉकडाऊन कालावधी दि. ३ मे २०२० रोजी पर्यंत वाढविण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिनांक १४ एप्रिल २०२० च्या आदेशान्वये पारित केलेल्या आदेशाची अंमलबजावणी दिनांक ३ मे २०२० रोजीचे २४.०० वाजेपर्यंत करण्याबाबत आदेशित केले आहे. तथापि महाराष्ट्र शासनाच्या दिनांक १७ एप्रिल २०२० रोजीच्या आदेशान्वये शासनाने परवानगी दिलेल्या बाबींच्या कार्यस्थळी सदरचा आदेश शिथिल करण्यात येत असून सदर ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग पाळणे बंधनकारक राहणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडील दिनांक १६ एप्रिल २०२०च्या आदेशान्वये पारित केलेल्या अधिसूचनेप्रमाणे इस्लामपूर नगरपरिषद स्थलसीमा हद्दीत तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडून वेळोवेळी कंटेनमेंट झोन व बफर झोन म्हणून अधिसूचित करण्यात आलेल्या प्रत्येक स्थलसीमा हद्दीत जिल्हाधिकारी कार्यालयाकडील दि. १४ एप्रिल २०२०चा आदेश पूर्ण प्रभावाने लागू राहील. या आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्ती विरूध्द भारतीय दंड संहिता १८६० चे कलम १८८ नुसार गुन्हे दाखल करण्याकामी सांगली जिल्ह्यातील संबंधित पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी / कर्मचारी यांना या आदेशाव्दारे प्राधिकृत करण्यात आले आहे, असे जिल्हादंडाधिकारी डॉ.चौधरी यांनी स्पष्ट केले आहे.