एकही गुणवंत विद्यार्थी बक्षीस योजनेपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्या – उपमहापौर हिराबाई घुले

लॉकडाऊनमुळे हाताला काम नसल्याने  उदरनिर्वाहासाठी शहरात आलेले अनेक नागरिक कुटुंबासह आपल्या मूळगावी गेले होते. त्यामुळे त्यांच्या दहावी, बारावीतील गुणवंत मुलांना पालिकेच्या बक्षीस योजनेसाठी अर्ज करता आला नाही.

    पिंपरी: कोरोनामुळे मागीलवर्षी दहावी आणि बारावीचे काही गुणवंत विद्यार्थी महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागाकडील इतर कल्याणकारी योजने अंतर्गंतच्या बक्षीस योजनेचा लाभ घेऊ शकले नाहीत. काहीजण आपल्या मूळगावी होते. तर, अनेकांना कोरोनामुळे अर्ज करता आले नाहीत. त्यामुळे मागीलवर्षी बक्षीस योजनेचा लाभ घेऊ न शकलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना यावर्षी लाभ द्यावा. यासाठी निधीची तरतूद कमी पडत असेल. तर,  त्यात वाढ करावी. एकही गुणवंत विद्यार्थी बक्षीस योजनेपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी सूचना उपमहापौर हिराबाई घुले यांनी महापालिका प्रशासनाला केली.

    याबाबत आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यात उपमहापौर घुले यांनी म्हटले आहे की, दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि पुढील शिक्षणासाठी आर्थिक मदत व्हावी या उद्देशाने महापालिकेने २०१३ पासून बक्षीस योजना सुरु केली आहे. त्यानुसार महापालिकेतर्फे ८० टक्यांहून अधिक गुण घेणा-या विद्यार्थ्यांचा बक्षिस देऊन सत्कार केला जातो.  मागीलवर्षी दहावी, बारावीच्या परीक्षा चालू असतानाच्या काळात १० मार्च २०२० रोजी शहरात राज्यातील कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. त्यानंतर कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू केला. पहिली लाट नोव्हेंबर २०२०पर्यंत होती.

    लॉकडाऊनमुळे हाताला काम नसल्याने  उदरनिर्वाहासाठी शहरात आलेले अनेक नागरिक कुटुंबासह आपल्या मूळगावी गेले होते. त्यामुळे त्यांच्या दहावी, बारावीतील गुणवंत मुलांना पालिकेच्या बक्षीस योजनेसाठी अर्ज करता आला नाही. तसेच कोरोनाच्या प्रसारामुळे अनेक विद्यार्थी अर्ज करू शकले नाहीत. त्यांना बक्षीस योजनेचा लाभ मिळाला नाही. मागीलवर्षी बक्षीस योजनेपासून वंचित राहिलेले विद्यार्थी, पालकांनी नुकतीच माझी भेट घेतली.