दौंड तालुक्यासाठी ही बाब चिंताजनक आणि भयभीत करणारी आहे. अगोदरच या गुऱ्हाळासाठी प्लास्टिक कागद, चप्पल,टायर,रबर,महिलांचे सॅनिटरी पॅड,आदी अविघटनशील पदार्थ या गुऱ्हाळावर गुळ बनवण्यासाठी येत होते आता त्यात कोरोनासारख्या विषाणूजन्य पीपीई किटची भर पडली आहे.
पारगाव : दौंड तालुक्यातील काही गुऱ्हाळ घराचे मालक व परप्रांतीय ठेकेदार सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यशी (health) खेळत आहे. कोरोना (Corona) सारख्या विषाणूपासून सरंक्षण होण्यासाठी डॉक्टरांना जे पीपीई किट (Medical waste) दिले जाते ते विषाणूजन्य किट दौंड तालुक्यात गुऱ्हाळ घरात चक्क जाळण्यासाठी मोठमोठ्या ट्रक मधून तालुक्यात येत असल्याचे भयानक चित्र पहायला मिळत आहे.
दौंड तालुक्यासाठी ही बाब चिंताजनक आणि भयभीत करणारी आहे. अगोदरच या गुऱ्हाळासाठी प्लास्टिक कागद, चप्पल,टायर,रबर,महिलांचे सॅनिटरी पॅड,आदी अविघटनशील पदार्थ या गुऱ्हाळावर गुळ बनवण्यासाठी येत होते आता त्यात कोरोनासारख्या विषाणूजन्य पीपीई किटची भर पडली आहे.
वास्तविक अशा जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापन कायदा लागू असताना या कायद्याचे उल्लंघन होत आहे. मुळातच मेडिकल वेस्टेजची प्रदूषण नियंत्रण मंडळाने परवाना दिलेल्या ठिकाणीच विल्हेवाट लावणे बंधनकारक (legal action) असताना दौंड तालुक्यात मात्र अशा अविघटनशील पदार्थांचे ट्रक भरून येत असल्याचे चित्र दिसून येत आहे. यासाठी तालुक्यात असा उद्योग करणाऱ्यांचे रॅकेट असण्याची शक्यता आहे अशी शंका दौंड तालुका शेतकरी राजा संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष राजाराम तांबे यांनी व्यक्त केली आहे.अशा अविघटनशील कचऱ्यातून निघणाऱ्या धुरामुळे मानवी जीवनावर विपरीत परिणाम होत आहेत,अशा गुऱ्हाळावर प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई करून फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी राजाराम तांबे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
दौंड तालुक्यात बहुतांश गुऱ्हाळघरे बेकायदेशीर व परप्रांतीय चालवत असल्याने त्यांना प्रदूषण नियंत्रण मंडळाची मान्यता त्यांच्यासाठी महत्वाची नसून त्यांच्यासाठी पैसा हेच सर्वच असून पैशासाठी स्थानिकांचे जीव धोक्यात घालत आहेत,
अशा बेकायदेशीर व आरोग्यासाठी अपायकारक गुळ बनवणाऱ्या गुऱ्हाळावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी यासाठी सुत्रधार,संबंधित दवाखाने,गुऱ्हाळ मालक,चालक,ठेकेदार,व वाहतूकदार,अशा समाजासाठी घातक परिणाम करणाऱ्या समाज कंटकावर कायदेशीर कारवाई करून फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी तांबे यांनी केली असून प्रशासनाने त्वरीत याची दखल घ्यावी अन्यथा येत्या २ ऑक्टोबर पासून जिल्हाधिकारी कार्यालय पुणे याठिकाणी आमरण उपोषण करण्याचा इशारा दौंड तालुका शेतकरी राजा संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष राजाराम तांबे यांनी दिला आहे यावेळी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करताना अध्यक्ष राजाराम तांबे, उपाध्यक्ष शांताराम बांदल, सचिव मंगेश फडके, निलेश थोरात आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.