रायगडमधल्या समुद्रकिनाऱ्यांवर सापडले ५ मृतदेह, बार्ज पी – ३०५ मधील बेपत्ता खलाशी असल्याचा संशय

रायगड(Raigad) जिल्ह्यामधील मुरूड समुद्रकिनारी शुक्रवारी रात्री एक मृतदेह(Dead body on the beach) सापडला. त्यानंतर नवगाव किनारी दोन, आवास आणि दिघोडी किनारी प्रत्‍येकी एक मृतदेह आढळून आले.

    अलिबाग : रायगडच्‍या(Raigad) वेगवेगळया समुद्रकिनारी दोन दिवसात एकूण ५ मृतदेह सापडले आहेत. या मृतदेहांची ओळख पटली नसली तरी ते अरबी समुद्रात बुडालेल्‍या पी ३०५ या तराफ्यावरील बेपत्‍ता खलाशांचे असावेत, असा अंदाज आहे.

    रायगड जिल्ह्यामधील मुरूड समुद्रकिनारी शुक्रवारी रात्री एक मृतदेह सापडला. त्यानंतर नवगाव किनारी दोन, आवास आणि दिघोडी किनारी प्रत्‍येकी एक मृतदेह आढळून आले. पी ३०५ या तराफ्यावरील बेपत्‍ता खलाशांच्या केलेल्या वर्णनाशी या मृतदेहांचे वर्णन मिळतेजुळते आहे. त्‍यामुळे हे मृतदेह अरबी समुद्रात बुडालेल्या पी ३०५ या तराफ्यावरील बेपत्ता कर्मचार्‍याचे असावेत अशी शक्यता वर्तवली जात आहे.

    तौक्ते चक्रीवादळामुळे अरबी समुद्रामध्ये बुडालेल्या पी ३०५ या तराफ्यावरील १३ कर्मचारी  बेपत्ता आहेत. त्यांचा शोध सुरू आहे. ज्‍या भागात मृतदेह सापडले तो परिसर मुंबईपासून जवळ आहे. दरम्‍यान रायगड जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी याबाबतची माहिती ओएनजीसी व संबंधित तपास यंत्रणांना दिली आहे. याबाबत खात्री करण्‍यासाठी ओएनजीसीचे पथक बेपत्‍ता खलाशांच्‍या नातेवाईकांसह रायगडमध्‍ये येणार आहे.