आशा वर्करच्या दक्षतेमुळे सापडला विचुंबेमधील कोरोना रुग्ण, टळला अनेकांचा संसर्ग

पनवेल : विचुंबे येथे रविवारी सापडलेल्या कोरोनाबाधित रुग्णाने लक्षण दिसत असतानाही कोणतीही काळजी घेतली नव्हती. कोरोनामुळे पनवेल पंचायत समितीतर्फे तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायत हद्दीत नागरिकांचा

पनवेल : विचुंबे येथे रविवारी सापडलेल्या कोरोनाबाधित रुग्णाने लक्षण दिसत असतानाही कोणतीही काळजी घेतली नव्हती. कोरोनामुळे पनवेल पंचायत समितीतर्फे तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायत हद्दीत नागरिकांचा सर्व्हे करण्यात येत असताना आशा वर्कर अर्चना भोईर यांच्या दक्षतेमुळे हा रुग्ण सापडला.  त्यामुळे अनेकांचा संसर्ग टळल्याची माहिती गट विकास अधिकारी तेटगुरे यांनी दिली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी ग्रामपंचायत हद्दीत आरोग्य कर्मचारी आणि आशा वर्कर यांच्याकडून परिसरात सर्व्हे करण्यास सांगितले आहे. पनवेल तालुक्यात उप विभागीय अधिकारी दत्ता नवले यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समितीचे कर्मचारी विचुंबे येथील पुष्प व्हॅली मध्ये १०  एप्रिलला सर्व्हे करीत असताना आशा वर्कर अर्चना भोईर  आणि अंगणवाडी सेविका त्याठिकाणी गेल्या असता या व्यक्तींच्या मुलांनी आपल्या वडिलांना डोकेदुखी, अंगदुखणे आणि ताप येत असून त्यांनी २ दिवस डॉक्टर महाजन यांच्याकडून औषधे घेऊन ही त्यांना बरे वाटत नसल्याची माहिती दिली. त्यांची माहिती घेऊन आशा वर्कर अर्चना भोईर यांनी ही माहिती ग्राम विकास अधिकारी चवरकर यांना दिली. त्यांनी तातडीने  पत्र देऊन त्याला उप जिल्हा रुग्णालय पनवेल येथे जाण्यास सांगितले पण तो गेला नाही. पनवेलला उप जिल्हा रुग्णालयात १२ तारखेला तो तपासणीसाठी गेला. तेथे तापाची आणि अशक्तपणावर औषधे देऊन त्याला खारघरला जाण्यास सांगितले पण तेथे न जाता तो घरी आला. त्याकाळात दूध आणि अंडी आणण्यासाठी बाजारात जात होता. ताप कमी न झाल्याने १६ तारखेला सायंकाळी त्याला  ग्राम विकास भवन खारघरमध्ये  दाखल करून नमुने घेऊन तपासणीला पाठवण्यात आले. त्याचा रिपोर्ट १८ तारखेला पॉझिटिव्ह आला. त्याच्यावर १९ एप्रिलपासून पनवेलच्या कोव्हिड रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांचा दोन्ही मुलांना ही खारघर येथील ग्राम विकास भवनात ठेवण्यात आले आहे. हा रुग्ण २१ मार्चला तामिळनाडूतून विचुंबेला आला होता. एप्रिल ३ ते ८ तो एस.टी  ने पनवेलहून मुंबईला  बी.पी.टी.च्या कार्यालयात जात होता. पहाटे भाजी मार्केटमध्ये भाजी खरेदीलाही जात होता.   
  विचुंबे येथील मूळच्या तामिळनाडूमधील या व्यक्तीने लक्षणे दिसत असतानाही वेळीच खारघरच्या ग्राम विकास भवनात दाखल न होता तो घरी राहिला . दूध आणि अंडी खरेदीसाठी तो सकाळी जात होता. त्याने उपचार घेतलेले डॉक्टर महाजन , त्याच्या कार्यालयातले सहकारी, बरोबर प्रवास केलेले आणि त्याची मुले यांच्या तो संपर्कात असल्याने त्यांना धोका निर्माण झाला आहे. संसर्गा झालेले नागरिक वेळेवर उपचार घेण्यास तयार नसल्याने धोका निर्माण होत असल्याचे ही यावेळी दिसून आले आहे .    
  विचुंबे येथे पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्यापासून गावात नवीन  आलेल्या व्यक्तींना सरपंच , पोलीस पाटील तसेच  सोसायटीमध्ये कोणी नवीन आल्यास सोसायटीचे पदाधिकारी डॉक्टरांकडून सर्टिफिकेट आणण्यास सांगत आहेत. त्यामुळे सकाळ पासून अशा व्यक्तींची गर्दी प्राथमिक आरोग्य केंद्रात होत आहे. हे चांगले आहे पण त्यामुळे अर्धावेळ सर्टिफिकेट देण्यातच जात आहे. –  डॉक्टर पाटील, प्राथमिक आरोग्य केंद्र, आजीवली