पनवेल: गावठी दारू पिऊन मोठी दुर्घटना होण्याची शक्यता असल्याने राज्यातील बियर शॉप आणि दारूची दुकाने लॉकडाऊनमध्ये सुरू करावीत, अशी मागणी शिवसेनेचे रायगड जिल्ह्याचे प्रमुख सल्लागार बबनदा
पनवेल: गावठी दारू पिऊन मोठी दुर्घटना होण्याची शक्यता असल्याने राज्यातील बियर शॉप आणि दारूची दुकाने लॉकडाऊनमध्ये सुरू करावीत, अशी मागणी शिवसेनेचे रायगड जिल्ह्याचे प्रमुख सल्लागार बबनदा पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेकडे केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहीलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, लॉकडाऊनमुळे बियर शॉप आणि दारूची दुकाने बंद असल्याने अनेक ठिकाणी काळ्या बाजारात दुप्पट – तिप्पट किमतीने बियर आणि दारूची विक्री होत आहे. अनेक कामगार रोजगार उपलब्ध नसताना जास्त पैसे देऊन दारू खरेदी करत असल्याने घरातील गृहिणीला मात्र पैशाची चण चण भासत आहे. घरात मुलांना दूध घेण्यासाठी पैसे नाहीत.त्यामुळे भविष्यात घर कसे चालवायचे असा प्रश्न पडला आहे.
अनेक गावात बंदमुळे लोकांनी घरातच गावठी दारूच्या भट्टया सुरू केल्या आहेत. पैसे नसल्याने अनेकजण आता हातभट्टीची दारू घेऊ लागले आहेत. या दारुमुळे राज्यात अनेक दुर्घटना घडून यापूर्वी अनेक बळी गेल्याची उदाहरणे आहेत. यासाठी अशी दुर्घटना घडण्यापूर्वी बियर शॉप आणि दारूची दुकाने सुरू करावीत. मनसेचे नेते राज ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे दारूची दुकाने बंद असल्याने शासनाचा महसूल बुडत आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार करून राज्यातील बियर शॉप आणि दारूची दुकाने सुरू करावीत, अशी मागणी त्यांनी केली आहे.