रायगड जिल्ह्यातील एकात्मिक औद्योगिक वसाहत क्षेत्रासाठी एजन्सी नेमण्याचे काम अंतिम टप्प्यात

पनवेल : मुंबईला पर्याय म्हणून नवी मुंबईची निर्मिती केल्यानंतर आता नवी मुंबईवरील ताण कमी करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये एकात्मिक औद्योगिक वसाहत म्हणजे नवनगर निर्मिती करण्याचे काम

पनवेल : मुंबईला पर्याय म्हणून नवी मुंबईची निर्मिती केल्यानंतर आता नवी मुंबईवरील ताण कमी करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये एकात्मिक औद्योगिक वसाहत म्हणजे नवनगर निर्मिती करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून प्रकल्पासाठी अधिसूचित केलेल्या क्षेत्राची मोजणी आणि सर्वेक्षणासाठी एजन्सी नेमण्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती अनिल पवार , मुख्य भूमी व भूमापन अधिकारी नवनगर विकास प्राधिकरण यांनी दिली आहे.  

 नवी मुंबईवरील वाढता ताण लक्षात घेऊन रायगड जिल्ह्यात नवनगर वसविण्यासाठी १९ जानेवारीला नगरविकास विभागाने अधिसूचना जाहीर केली. याद्वारे रायगड जिल्ह्यातील मुरुड, अलिबाग, रोहा आणि श्रीवर्धन अशा चार तालुक्यांमधील ४० गावांच्या जमिनीवर नवनगर विकसित करण्यात येणार असल्याचे घोषित करण्यात आले. रोहा तालुक्यातील सर्वाधिक म्हणजेच २१, अलिबाग ७, मुरुडमधील १० गावांचा यामध्ये समावेश आहे, तर श्रीवर्धन तालुक्यातील वारळ नामक एकमेव गावाचा समावेश यामध्ये करण्यात आला आहे. १९ हजार १४६ हेक्टर अंदाजित क्षेत्रफळावर हे नवनगर विकसित करण्याचे ठरले आहे. सिडकोवर ही जबाबदारी असली तरी सिडको नवनगर विकास प्राधिकरण म्हणून हे काम पाहणार आहे. नवनगरच्या घोषणेची अधिसूचना जाहीर केल्यापासून यापूर्वी कार्यरत असलेल्या विशेष नियोजन प्राधिकरणाचे अधिकार संपुष्टात येणार असल्याचे अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहेत.  नवनगराच्या अधिसूचित क्षेत्राच्या हद्दीची माहिती देणारा नकाशा नागरिकांना पहाण्यासाठी तो अधिसूचना जाहीर झाल्यापासून एक महिन्याच्या कालावाधीसाठी कोकण आयुक्त कार्यालय बेलापूर, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक नवी मुंबई, जिल्हाधिकारी रायगड कार्यालय अलिबाग, नगररचना विभागाचे सहसंचालक बेलापूर, सहाय्यक संचालक अलिबाग यांच्या कार्यालयात ठेवण्यात आला होता रोहा तालुक्यातील चणेरे ग्रामस्थसेवा मंडळ (स्थानिक ) मुंबईचे अध्यक्ष प्रकाश विचारे यांना पाठवलेल्या १३ मे २०२० च्या पत्रात अनिल पवार,  मुख्य भूमि व भूमापन  अधिकारी  नवनगर विकास प्राधिकरण यांनी रायगड जिल्ह्यातील मुरुड, अलिबाग, रोहा आणि श्रीवर्धन अशा चार तालुक्यांतील  क्षेत्र  एकात्मिक औद्योगिक वसाहत प्रकल्पासाठी अधिसूचीत करण्यात आले असून या क्षेत्राची मोजणी आणि सर्वेक्षणासाठी एजन्सी नेमण्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती दिली आहे.