दिपक पाटील, कर्जत:लॉकडाऊनमुळे अनेक ठिकाणी लोक अडकून पडले आहेत. गेले दीड महिना लॉकडाऊन सुरूच असल्याने त्यातील काही जणांनी आता चालत परतीचा मार्ग धरला आहे. कर्जत तालुक्यातील कळंब येथे असेच
दिपक पाटील, कर्जत: लॉकडाऊनमुळे अनेक ठिकाणी लोक अडकून पडले आहेत. गेले दीड महिना लॉकडाऊन सुरूच असल्याने त्यातील काही जणांनी आता चालत परतीचा मार्ग धरला आहे. कर्जत तालुक्यातील कळंब येथे असेच उत्तरप्रदेशला निघालेले नागरिक दृष्टीस पडल्याने कळंबच्या मुस्लिम तरुणांनी त्यांची राहण्याची सोय करून प्रशासनाला त्यांना इच्छितस्थळी मार्गस्थ करण्याची विनंती केली आहे.
कोरोना विषाणूने जगभर एकच हल्लकल्लोळ माजवला आहे. त्यामुळे भारतात २२ मार्च रोजी जनता कर्फ्यूचे आवाहन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. त्यानंतर २३ मार्चपासून २१ दिवस लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. कोरोना विषाणूचा धोका अजून आटोक्यात आला नसल्याने अजून लॉकडाऊन सुरूच आहे. तब्बल दीड महिना लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे कामधंद्यानिमित्त परराज्यतून महाराष्ट्रात आलेल्या मजूर, गरीब यांचे मोठे हाल झाले आहेत. शासनाकडून त्यांना मदतीचा हात म्हणून धान्याचे किट ठिकठिकाणी वाटप करण्यात आले. लॉकडाऊनमुळे सर्व प्रकारची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुद्धा ठप्प आहे. मात्र घराच्या ओढीने ही कुटुंबे आता गावाकडे पायी चालत निघाली आहेत. खोपोली येथे मजूरीचे काम करणारे असेच ६० ते ७० जण कर्जत तालुक्यामार्गे उत्तरप्रदेशला निघाले होती. रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात निघालेले लोक पाहिल्याने कळंब येथील मुस्लिम तरुणांनी त्यांनी विचारपूस केली तेव्हा ते सर्व उत्तरप्रदेश प्रयागराज येथील राहणारे असून आपल्या गावी चालत निघाले असल्याची माहिती त्यांनी दिली. हे माहिती कळताच कळंब येथील मुस्लिम तरुणांनी त्यांना थांबवून चहा बिस्कीट दिले. तसेच ते सर्व भर उन्हात पायी चालत आल्यामुळे त्यांच्यातील लहान मुले व महिला यांच्या पायाला इजा झाली होती. तेव्हा मुस्लिम तरुणांनी त्या सर्वांची आरोग्य तपासणी कळंब आरोग्य केंद्राच्या डॉक्टरांकडून करवून घेऊन त्या सर्वांची व्यवस्था गावातील फुरकान यांच्या घरी केली. तसेच पोलीस उपनिरीक्षक केतन सांगळे व नायब तहसीलदार यांना देखील या कामगारांबद्दल माहिती दिली. या सर्व अधिकाऱ्यांच्या व प्रशासनाच्या साहाय्याने या कामगारांचे ऑनलाईन फॉर्म भरून त्यांना मार्गस्थ करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मुस्लिम समाजाचा पवित्र असा रमजान महिना सुरु आहे. तेव्हा मुस्लिम समाजाचे आदरणीय असलेले मोहमद पैगंबर यांच्या शिकवणीप्रमाणे भुकेलेल्या अन्न दिले पाहिजे. जोपर्यंत या सर्वांची घरी जाण्याची सोय होत नाही तोपर्यंत त्यांची सगळी जबाबदारी कळंब गावातील मुस्लिम समाजाने घेतली आहे.