नुकसान झालेल्या बागायतदारांच्या वाढीव मदतीसाठी शासनाकडे पाठपुरावा सुरु – खासदार सुनील तटकरे

श्रीवर्धन: निसर्ग चक्रीवादळाने रायगड जिल्ह्यातील किनारपट्टीच्या सर्व भागांना मोठ्या प्रमाणात झोडपून काढले. चक्रीवादळामध्ये सर्वाधिक नुकसान श्रीवर्धन तालुक्यात झाले आहे. श्रीवर्धन तालुक्यातील

श्रीवर्धन: निसर्ग चक्रीवादळाने रायगड जिल्ह्यातील किनारपट्टीच्या सर्व भागांना मोठ्या प्रमाणात झोडपून काढले. चक्रीवादळामध्ये सर्वाधिक नुकसान श्रीवर्धन तालुक्यात झाले आहे. श्रीवर्धन तालुक्यातील हरिहरेश्वर, श्रीवर्धन, दिवेआगर, आदगाव त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील खुजारे, नागलोली, कारले या ठिकाणी असलेल्या नारळ सुपारीच्या वाड्या पूर्णपणे उध्वस्त झाल्या आहेत. वादळात ज्या नागरिकांचे नुकसान झाले आहे, त्यांना मदत वाटप सुरू झाले आहे. प्रत्येक नागरिकाच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत. वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी सुद्धा युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. ज्या बागायतदारांची नारळ व सुपारीची रोपे पूर्णपणे पडली आहेत, अशा बागायतदारांच्या घरी जाऊन कृषी सहाय्यक झाडांची मोजणी करतील व या झाडांच्या मोजणीप्रमाणे त्यांना वाढीव मदत देण्यासाठी आपण शासनाकडे पाठपुरावा करत असल्याची माहिती या बैठकीसाठी उपस्थित असलेले खासदार सुनील तटकरे यांनी दिली.

या बैठकीसाठी जिल्हा कृषी अधिकारी शेळके, तालुका कृषी अधिकारी भांडवलकर तसेच कृषी व फलोत्पादन विभागाचे सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आपण पालकमंत्री या नात्याने संपूर्ण जिल्ह्याचा आढावा व अॅक्‍शन प्लॅन तयार करण्यासाठी ही बैठक आयोजित केल्याचे आदिती तटकरे यांनी सांगितले. कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी येत्या आठ दिवसांमध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये किती नुकसान झाले आहे व बागायतदारांना किती रोपे नवीन लावण्यासाठी लागणार आहेत, याबाबत संपूर्ण माहिती गोळा करणार आहेत. शासनाकडून  लागवडीसाठी नवीन रोपे, त्याचप्रमाणे खड्डे खणण्यासाठी पैसे,  कुंपण या सर्वांसाठी बागायतदारांना अनुदान मिळणार आहे. रायगड जिल्ह्यातील नारळ सुपारीच्या त्याचप्रमाणे आंबा-काजूच्या बागा पुन्हा उभ्या करण्यासाठी माझ्याकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असे पालकमंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले. सुपारी संशोधन केंद्र श्रीवर्धन या ठिकाणी असल्याने या ठिकाणी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी सुपारीची जास्तीत जास्त रोपे तयार करावी लागणार आहेत आणि ती सुद्धा श्रीवर्धनची रोठा सुपारी असावी असे खासदार तटकरे यांनी सांगितले.त्याचप्रमाणे केळी, अननस, जायफळ, कोकम,गरम मसाल्याची लागवड करता येईल व ही आंतरपिके असतील. या बैठकीला श्रीवर्धनचे प्रांताधिकारी अमित शेडगे, तहसीलदार सचिन गोसावी देखील उपस्थित होते.

या बैठकीनंतर खासदार सुनील तटकरे यांनी विविध नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या व तहसीलदार यांना काय मदत करता येईल याबाबत पंचनामे पुन्हा पडताळून पाहण्याच्या सूचना केल्या. यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की गोंडघर स्विचींग स्टेशन कालच सुरू करण्यात आलेले आहे त्यामुळे बोर्लिपंचतन परिसरातील वीजपुरवठा लवकरच सुरू करण्यात येईल.