आता काय होईल ते होईल, मी गप्प बसणार नाही; संभाजी छत्रपती रायगडावरुन गरजले

"आत्तापर्यंत तुम्ही माझा संयम पाहिला. हो आहे मी संयमी. पण इथून पुढे तुम्ही माझा संयम पाहणार नाहीत. मी मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय गप्प बसणार नाही. काय होईल ते होईल. म्हणून आम्ही ठरवलंय की आंदोलन हे निश्चित आहे", अशा शब्दांत संभाजीराजे भोसले यांनी सरकारला सुनावलं आहे.

    रायगड : खासदार संभाजी छत्रपती यांनी रायगडावरून पुन्हा एकदा मराठा आरक्षणाबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली. मी राजकारणी नाही, मी राजकारण करत नाही. पण मधल्या काळात लोक माझ्यावर नाराज झाले. पण मला समाजाला वेठीस धरायचं नाही. धरणार नाही. दिशाभूल करणं आमच्या रक्तात नाही, असं सांगतानाच चुकलो असेल तर मी दिलगिर आहे, असं संभाजी छत्रपती यांनी सांगितलं.

    दरम्यान “आत्तापर्यंत तुम्ही माझा संयम पाहिला. हो आहे मी संयमी. पण इथून पुढे तुम्ही माझा संयम पाहणार नाहीत. मी मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय गप्प बसणार नाही. काय होईल ते होईल. म्हणून आम्ही ठरवलंय की आंदोलन हे निश्चित आहे”, अशा शब्दांत संभाजीराजे भोसले यांनी सरकारला सुनावलं आहे. यावेळी येत्या १६ जूनला पहिला मोर्चा काढण्याचा इशारा खासदार संभाजीराजे भोसले यांनी दिला आहे. यासाठी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळापासून पहिला मोर्चा काढणार असल्याची घोषणा संभाजीराजे भोसले यांनी केली आहे.

    मी संयम बाजूला केला आहे – संभाजीराजे

    “तुम्ही आजपर्यंत संभाजी छत्रपतींना संयमी बघितलं आहे. हो आहे मी संयमी. पण आजपासून तो संयम मी बाजूला ठेवला आहे. खासदार लोकसभेचा पगार घेतात, आमदार विधानसभेचा पगार घेतात. तुमची जबाबदारी आहे ती. पण कुठलाही आमदार पुढे आलेला नाही. तुमची काय जबाबदारी आहे यावर बोला. आत्ताच्या सरकारला हात जोडून विनंती केली. पण तरी काही फरक पडत नाही. पण यापुढे तुम्ही माझा संयम बघूच शकणार नाही. मी मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय गप्प बसणार नाही. काय होईल ते होईल. म्हणून आम्ही ठरवलंय की आंदोलन हे निश्चित आहे”, अशा शब्दांत संभाजीराजेंनी राज्य सरकारला इशारा दिला आहे.

    “आम्हाला गृहीत धरू नका, एवढंच सांगतो”

    “मला सांगायचंय की सध्या तुम्ही रस्त्यावर येऊ नका. पहिली जबाबदारी आमच्या लोकप्रतिनिधींची आहे. पहिला मोर्चा शाहू महाराजांच्या समाधीच्या ठिकाणाहून आमचा पहिला मोर्चा होणार आहे. लोकप्रतिनिधींनी सांगायला हवं की सकल मराठा समाजाला तुम्ही कसा न्याय देणार आहात. तेव्हाच बोलायचं. कोविड संपल्यानंतर देखील तु्म्ही ठोस पावलं उचलली नाहीत, तर संभाजीराजांसह संपूर्ण मराठा समाज मुंबईपर्यंत लाँग मार्च करणार. तिथे तुम्हाला लाठी मारायची असेल, तर पहिली लाठी संभाजी राजेला मारावी लागेल. छत्रपतींच्या वंशजावर पहिली लाठी मारावी लागेल. आम्हाला गृहीत धरू नका, एवढंच सांगतो”, असं देखील संभाजीराजे भोसले यावेळी म्हणाले. येत्या १६ जूनला पहिला मोर्चा काढणार असून करोनाचं संकट ओसरल्यानंतर देखील पावलं उचलली गेली नाहीत, तर लाँगमार्च काढला जाईल, यामध्ये लाखो लोक सहभागी होतील, असा इशारा संभाजीराजे भोसले यांनी यावेळी दिला.

    “कोण चुकलं कोण बरोबर, आम्हाला घेणं-देणं नाही”

    “२००७ पासून मी महाराष्ट्र पिंजून काढला. ज्या सुखाने बहुजन समाज नांदत होता, मराठा समाज नांदत होता, तो आज का नाही. म्हणून मी मराठा समाजासाठी बाहेर पडलो. किती आंदोलनं केले. पण सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागास नाही. तो SEBC मध्ये येऊ शकत नाही. म्हणून समाजाला मिळालेलं आरक्षण काढून घेण्यात आलं. त्यामुळे सगळे समाजाचे लोक दु:खी झाले. पण माझा लढा ७० टक्के गरीब मराठ्यांसाठी आहे. आपलेच पुढारी कोण चुकलं-कोण बरोबर या स्पर्धेत लागले. मागच्या सरकारचे लोकं म्हणाले आत्ताच्या सरकराने मांडणी बरोबर केली नाही. आत्ताचं सरकार म्हणतंय तुम्ही कायदा बरोबर केला नाही. मी मोठा की तू मोठा, हेच चाललं आहे. आमची मागणी एकच आहे, आम्हाला न्याय द्या. कोण चुकलं त्याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही”, अशा शब्दांत संभाजीराजे भोसले यांनी आपला संताप व्यक्त केला.

    मुंबई ते पुणे लाँग मार्च

    मराठा समाजाचा मागण्या मान्य न झाल्यास मुंबई ते पुणे लाँग मार्च काढणार, असा इशाराही संभाजीराजे यांनी दिला आहे. तिथे तुम्हाला लाठी मारायची असेल, तर पहिली लाठी संभाजी राजेला मारावी लागेल. छत्रपतींच्या वंशजावर पहिली लाठी मारावी लागेल. आम्हाला गृहीत धरू नका, असेही त्यांनी सांगितले.

    पाच मागण्यांवर तात्काळ कार्यवाही करावी

    सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली. या समितीने अहवालात काही शिफारसी केल्या होत्या, मी पत्रकार परिषद घेऊन ज्या गोष्टी नमूद केल्या होत्या त्याच समितीने सांगितल्या. मी सांगितलेल्या पाच मागण्यांवर तात्काळ कार्यवाही करावी, समाजाला वेठीस धरु नये, याचा त्यांनी पुनरूच्चार केला.

    तसेचं ‘माझा लढा ७० टक्के गरीब मराठ्यांसाठी आहे. आपलेच पुढारी कोण चुकलं-कोण बरोबर या स्पर्धेत लागले. मी मोठा की तू मोठा, हेच चालले आहे. आमची मागणी एकच आहे, आम्हाला न्याय द्या. कोण चुकले त्याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही,’  असं खा संभाजीराजे छत्रपती म्हणाले