कोकण किनारपट्टीवर डॉपलर वेदर रडारची कमतरता; आपत्ती आधी सूचना मिळण्यास होतोय विलंब

तौक्ते चक्रीवादळानंतर भारतीय हवामान खात्याने दीर्घ पल्ल्याच्या पल्स डॉपलर वेदर रडारची स्थापना रत्नागिरीत करण्याचे घोषित केले आहे, परंतु, अद्याप त्याचे काम सुरू झालेले नाही. जागतिक पातळीवर तसेच मुख्यत्वे करून अरबी समुद्रामध्ये हवामानाची परिस्थिती ज्या पद्धतीने बदलत आहे त्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

    रत्नागिरी: कोकणात झालेल्या अतिवृष्टीमुळे अचानक उद्भवलेल्या पूरस्थितीने अनेकांना प्राण गमवावे लागले. कोकण किनारपट्टीवर डॉप्लर वेदर रडार नसल्याने पूर्वसूचना मिळण्यात दिरंगाई होत आहे. तौक्ते चक्रीवादळानंतर भारतीय हवामान खात्याने दीर्घ पल्ल्याच्या पल्स डॉपलर वेदर रडारची स्थापना रत्नागिरीत करण्याचे घोषित केले आहे, परंतु, अद्याप त्याचे काम सुरू झालेले नाही. जागतिक पातळीवर तसेच मुख्यत्वे करून अरबी समुद्रामध्ये हवामानाची परिस्थिती ज्या पद्धतीने बदलत आहे त्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
    अलीकडच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर तर अचूक आणि लवकर अंदाज घेण्याच्या आवश्यकतेची तीव्रता वाढली आहे. धोक्याची पूर्वसूचना अर्धा धोका कमी करते. या उपकरणाची सुमारे ४०० की. मी. क्षेत्रावर कार्य करण्याची क्षमता असून त्याची हवामानाच्या अंदाजाची अचूकता देखील मोठ्या प्रमाणात आहे.

    रत्नागिरी नजीकच्या पूरग्रस्त भागात आणि कोकण व महाराष्ट्रात राहणार्‍या नागरिकांची सुरक्षितता आणि त्यांचे कल्याण याची काळजी घेण्यास प्रशासनासाठी हे अत्यंत महत्वपूर्ण आहे. मात्र अद्याप ही यंत्रणा कोकण किनारपट्टीवर नाही. त्यामुळे अचानक आलेला पूर, हवामानातील बदल, वादळ, वारे याचा अचूक अंदाज मिळत नाही. अतिवृष्टी, वादळे या गोष्टींचा लवकर अंदाज आल्यास पूर्व उपाययोजना करण्यास अधिक वेळ मिळेल, ज्यायोगे मोठ्या प्रमाणात होणार्‍या दुर्घटना टाळण्यास सध्याच्या तुलनेत जास्त मदत होईल.

    पूर्व किनारपट्टी नियंत्रित
    देशाची पूर्वेकडील किनारपट्टी बर्‍याच अंशी अशा ११ रडारनी नियंत्रित केली आहे. याउलट, पश्चिम किनारपट्टी आणि पश्चिम घाट भागातील अशा रडारची कमतरता हवामानखात्याच्या अचूक आणि कार्यक्षम हवामान अंदाज वर्तवण्याच्या क्षमतेस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण करीत आहे.

    कोकणच्या अगदी मध्यभागी म्हणजेच रत्नागिरीत, उत्तर केरळ व कर्नाटकच्या किनाऱ्यावर योग्य ठिकाणी असे अतिरिक्त रडार बसवणे आवश्यक आहे. या सर्व बाबी लक्षात घेता, हे रडार बसविण्याचे काम लवकरात लवकर सुरू करण्याची व पुढील पावसाळा हंगामपूर्वी ते पूर्ण करण्याच्या उद्दिष्टाने त्याला प्राधान्य देण्याची विनंती मी भूगर्भ शास्त्र मंत्रालय भारत सरकारला पत्राद्वारे केली आहे. -मिलिंद किर, सामाजिक कार्यकर्ते