motivation

एखाद्या चित्राचे रंग उडाले म्हणून काही आपण चित्र फाडत नाही. असे झाल्यावर एक गोष्ट लक्षात ठेवायची की सर्वच काही आपले नसते, आपल्या दु:खात कदाचित दुसऱ्याचे सुख असते. याचाही विचार केला पाहिजे. छोटय़ाशा या आयुष्यात खूप काही हवं असतं, पण पाहिजे तेच मिळत नसते.

एखाद्या चित्राचे रंग उडाले म्हणून काही आपण चित्र फाडत नाही. असे झाल्यावर एक गोष्ट लक्षात ठेवायची की सर्वच काही आपले नसते, आपल्या दु:खात कदाचित दुसऱ्याचे सुख असते. याचाही विचार केला पाहिजे. छोटय़ाशा या आयुष्यात खूप काही हवं असतं, पण पाहिजे तेच मिळत नसते. त्यासाठीच अपयश आले तरी सतत पुढे चालत राहण्याचा मार्ग सोडता कामा नये.

आयुष्यात प्रत्येक घटना आपल्याला आपल्या मनासारखी घडते असे होत नाही, माणूस राग जितक्या सहजतेने व्यक्त करतो तितक्याच सहजतेने प्रेमही व्यक्त केले असते तर जगायला किती मजा आली असती. कारण माणसाच्या निम्या समस्या या व्यक्त केलेल्या रागामुळे आणि कधीच व्यक्त न केलेल्या प्रेमामुळे वाढतात. शब्द बोलताना शब्दाला धार नाही तर आधारच असायला हवा कारण धार असलेले शब्द मन कापतात आणि आधार असलेले शब्द मन जिंकतात. आपल्याला एक गोष्ट कायम लक्षात घेतली पाहिजे की आपल्या आयुष्यात जे घडते ते फक्त आपणच घडवत असतो.

आयुष्यातले निर्णय चुकतात आणि आयुष्य चुकत जाते, त्यातला प्रश्न आपल्याला कधीच कळत नाही आणि त्यामुळे उत्तर मात्र चुकत जाते. सोडवताना वाटते सुटत गेला गुंता, पण प्रत्येक वेळी एक नवीन गाठ बनत जाते. आपले कुठे चुकते हे कळत नाही आणि दाखवणाऱ्याला वाट माहीत नसते त्यामुळे त्याच्या सल्ल्याचा उपयोग होऊ शकत नाही, चालणाऱ्याचे ध्येय मात्र हरवून जाते. काही गोष्टी दिसतात तितक्या सोप्या नसतात पण अनुभव म्हणजे काय हे तेव्हाच कळते. असे हास्य बनवा ज्याला रहस्य असणार नाही. कायम अशी माणसे सोबत ठेवा की जेव्हा वेळ येईल तेव्हा तुमची सावली आणि वेळ येईल तेव्हा ती तुमचा आरसा बनायला तयार असतील. कारण सावली कधी साथ सोडत नाही आणि आरसा कधी खोटे बोलत नाही. एखादे स्वप्न पूर्ण झाले नाही, म्हणून रडायचे नसते.

असंख्य चांदण्यांनी भरून आपले आभाळ मात्र कायमच रिकामे असते. हव्या असलेल्या सगळ्याच गोष्टी माणसाला मिळत नसतात, पण न मिळणाऱ्याच गोष्टी माणसाला का हव्या असतात. याचं उत्तर आपल्यालाच माहीत नसते. म्हणूनच सुरेश भट म्हणतात, ‘आयुष्य छान आहे, थोडे लहान आहे, रडतोस काय वेडय़ा लढण्यात शान आहे. काटय़ातही फुलांची झुलती कमान आहे. उचलून घे हवे ते दुनिया दुकान आहे. जगणे निर्थक म्हणतो तो बेईमान आहे.’ सुखासाठी कधी कधी हसावे लागते, तर कधी कधी रडावे लागते. कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावे लागते.

चारचौघात बसण्यापेक्षा कधी कधी सुमद्र किनाऱ्यावर जाऊन बसावे, आठवणीला घेऊन बसावे; आयुष्य जास्त सुंदर वाटते. आपल्याला कोण हवे यापेक्षा आपण कोणाला हवे आहोत याचा सुद्धा कधीतरी विचार करायचा असतो. कारण अथांग आकाशातले तारे कधीच मोजून होत नाही, तशाच माणसाच्या गरजा कधीच पूर्ण होत नाही. शक्य तितके तारे मोजून आपण मात्र समाधानी राहावे. मौल्यवान गोष्ट म्हणजे आनंद पण गंमतीची गोष्टी अशी की ती मौल्यवान असूनही आपल्याला ती विनामूल्य मिळते, पण त्याहूनही गंमतीची गोष्ट अशी की आपल्यापैकी बऱ्याच लोकांना आयुष्य संपेपर्यंत त्याचा पत्ताच नसतो. उगवणाऱ्या प्रत्येक सूर्याला आनंदाने सामोरी जा, तो मावळताना आपल्याला प्रचंड प्रमाणात समाधान देऊन जाईल.

खरे सांगायचे झाले तर आनंद हा फुलपाखरासारखा असतो. त्याचा पाठलाग केला की तो दूर पळतो, पण आपण निश्चल बसलो की अलगद आपल्या खांद्यावर येऊन बसतो. प्रश्न सुटण्यासारखा असेल, तर काळजी करण्यासारखे त्यात काय आणि तो सुटत नसेल, तर काळजी करून उपयोग काय? पराभवाने माणूस कधीच संपत नाही. प्रयत्न सोडतो तेव्हा तो संपतो. आपल्या कठीण काळात सतत स्वत:ला सांगा, शर्यत अजून संपली नाही, कारण मी अजून जिंकलो नाही. सतत आयुष्याच्या प्रत्येक वळणावर स्वत:ला विश्वास देत रहा कारण आपले आयुष्य आपण घडवायचे आहे. आपण ठरवल्याशिवाय त्यात सकारात्मक बदल घडू शकत नाही आणि कधीच सोबत कोणी नसले तरी आपण कायम आपल्यासाठी उभे राहणे महत्त्वाचे.