jayant patil

    सांगली / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : सांगली जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी 8 पासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत साधारणपणे 100 मि.मी. पाऊस पडल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सांगली आर्यविन पूल येथे पाणीपातळी 52 फूटापर्यंत पोहोचेल असा सुरूवातीचा अंदाज होता. पण काहीसा पावसाचा जोर मंदावल्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग मर्यादित करण्यात आला.

    सांगली शहरामध्ये पाणी अधिक प्रमाणात जावू नये यासाठी पाणी विसर्ग नियंत्रित करून आर्यविन पूल येथे 45 ते 46 फूटापर्यंत पाणीपातळी राहील या पध्दतीने नियोजन करण्यात येत आहे, अशी माहिती जलसंपदामंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिली.

    राजापूर बंधाऱ्यावर कोयनेमधील विसर्ग हा जवळपास 45 हजार क्युसेकचा आहे. सातारा जिल्ह्यातील 4 धरणे व कोयना धरणामधील विसर्ग असा एकूण विसर्ग जवळपास 1 लाख क्युसेक आहे. सर्व मिळून राजापूर बंधाऱ्यातून पुढे जाणारा एकूण विसर्ग हा जवळपास 2 लाख क्युसेकपर्यंत असल्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.