…तर पालिकांना आर्थिक मदत दिली जाणार : एकनाथ शिंदे

    महाबळेश्वर : केंद्र सरकारकडून लसींचा आवश्यक पुरवठा उपलब्ध होत नाही, अशावेळी लसीकरणासाठी शासनावर अवलंबून न राहता राज्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांनी लस खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. महाबळेश्वर पांचगणी पालिकांनी जर पुढाकार घेतला तर काही प्रमाणात नगरविकास विभागाच्या वतीने पालिकांना आर्थिक मदत दिली जाईल, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे यांनी दिले.

    लसीकरणाबाबत निर्णय घेण्यासाठी आमदार मकरंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली येथील हाॅटेल ड्मिलॅण्डच्या सभागृहात तालुक्यातील अधिकारी विविध संघटना लोकप्रतिनिधी व नागरिकांची एक महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होेते. या बैठकीत एकनाथ शिंदे हे बोलत होते. आमदार महेश शिंदे, पंचायत समितीचे सभापती संजय गायकवाड, उपनगराध्यक्ष अफजल सुतार, पालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील व विविध खात्यांचे अधिकारी नगरसेवक उपस्थित होते.

    एकनाथ शिंदे म्हणाले, कोरोनामुळे सर्वांचीच अवस्था बिकट झाली आहे. कोरोनाच्या दोन लाटा येऊन गेल्या. आता काही दिवसांनी तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तिसरी लाट ही लहान मुलांसाठी घातक असल्याचेही तज्ञांनी अंदाज व्यक्त केला आहे, अशावेळी कोरोनाला रोखण्यासाठी नागरिकांचे १०० टक्के लसीकरण होणे आवश्यक आहे.

    महाबळेश्वर, पांचगणीतील लोक पर्यटनावरच अवलंबून

    महाबळेश्वर व पांचगणी ही दोन्ही थंड हवेची ठिकाणे आहेत. पर्यटनावरच येथील स्थानिक लोकांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. यापेक्षा अधिक काळ ही पर्यटन स्थळे बंद राहणे, हे येथील लोकांच्या दृष्टीने योग्य नाही. ही पर्यटनस्थळे शक्य तितक्या लवकर उघडली पाहिजे, याबाबत कोणाचे दुमत नाही. पण हे केव्हा शक्य होईल, जेव्हा येथील नागरिकांचे संपूर्ण लसीकरण होईल. तेव्हा यासाठी आता आपल्याला पुढाकार घ्यावा लागणार आहे.

    स्थानिक स्वराज्य संस्थांकडून लस खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू

    राज्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांनी लस खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. महाबळेश्वर पांचगणी नगरपालिका व पंचायत समितीने याबाबत जर पुढाकार घेण्याचा निर्णय घेतला. तर काही प्रमाणात आपण लस खरेदी करण्यासाठी नगरविकास विभागाच्या वतीने लागणारी आर्थिक तरतूद करण्यात येईल. आता शहरातील विविध संस्था दानशूर व्यक्ती यांनीही आर्थिक मदतीचा हातभार लावण्यासाठी पुढे यावे, असे आवाहनही एकनाथ शिंदे यांनी केले.

    …तर विकासकामांचा उपयोग काय?

    कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीही राज्य शासनाने भरपूर पैसा खर्च केला आहे. आता यामध्ये लसीकरण हे महत्वाचे आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण हे महत्वाचे आहे. आपण शासनाकडून आलेल्या निधीतून विकास कामे करतो. मात्र, लोकांचा जीव सुरक्षित नसेल तर विकासकामांचा काय उपयोग? अशा विकासकामांना काही अर्थ नाही. त्यामुळे लोकांचे जीव वाचविण्यासाठी प्राधान्य दिले पाहिजे, असेही ते म्हणाले.