मुख्यमंत्री ठाकरे यांनी साधला सोलापूर जिल्ह्यातील सरपंचांशी संवाद

    सोलापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोलापूर जिल्ह्यातील सरपंचाशी संवाद साधला. त्यांच्या या संवादाने आमचा हुरूप आणखी वाढला, अशी भावना सोमवारी (दि.७) सोलापूर जिल्ह्यातील सहा सरपंचांनी व्यक्त केली. मोहोळ तालुक्यातील आष्टी येथील सरपंच डॉ. अमित व्यवहारे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना गाव कोरोनामुक्त करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

    गाव कोरोनामुक्त ठेवण्यासाठी राज्यातील विविध सरपंचांनी आपआपल्या परीने उपक्रम राबविले आहे. पुणे, नाशिक व कोकण विभागात चांगली कामगिरी करणाऱ्या काही सरपंचांशी आज मुख्यमंत्री ठाकरे यांनी संवाद साधला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील उपस्थित होते.

    जिल्हाधिकारी कार्यालयात आज आष्टी ता. मोहोळचे सरपंच अमित व्यवहारे, गोपाळपूर ता. पंढरपूरचे सरपंच विलास मस्के, चिंचणी ता. पंढरपूरच्या सरपंच मुमताज शेख, जकापूर ता. अक्कलकोटच्या सरपंच दीपाली आळगी, आंधळगाव ता. मंगळवेढाच्या सरपंच शांताबाई भाकरे, रहाटेवाडी ता. मंगळवेढा वर्षाराणी गोपाळ पवार उपस्थित होत्या.

    डॉ. अमित व्यवहारे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना त्यांनी गावात राबविलेल्या उपायांबाबत माहिती दिली.
    त्यांनी सांगितले की, सोलापूर जिल्हा परिषेदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी ‘माझं गाव कोरोनामुक्त गाव व गाव तिथे कोविड सेंटर’ ही संकल्पना सुरू केली. जिल्हा परिषदेने विविध १५ अभियाने दिली. त्यातून आम्ही गावातील सिल्हवर ओक स्कूलमध्ये कोविड केअर सेंटर सुरू केले. सेंटर सुरू झाले. त्यावेळेस ३५ पेशंट होते. या पेशंटना सेंटरच्या बाहेर जाऊ दिले नाही. यामुळे संक्रमणाला आळा बसला. त्याचबरोबर कोविड सेंटरमध्ये चांगले उपचार, सकस आहार आणि पेशंटची मानसिक स्थिती चांगली राहिल, याकडे लक्ष दिले. ‘मी डॉक्टर असल्यामुळे रूग्णांना तपासत होतो. जिल्हा परिषदेच्या वतीने माझे गाव कोरोना मुक्त गाव अभियान सुरू केले. यामध्ये आम्ही टेस्टिंग, ट्रेसिंग व ट्रीटमेंट या त्रिसूत्रीचा प्रभावी वापर केला. जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम विभागाचे सभापती विजयराज डोंगरे यांची ग्रामीण कोविड सेंटर उभारणीसाठी चांगली मदत झाल्याचे डॉ. व्यवहारे यांनी सांगितले.

    सरपंचांशी झालेल्या महासंवादाच्या कार्यक्रमाच विविध कोरोनामुक्ती बरोबरच विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले. ग्रामपंचायतीचे सरपंचांना प्रातिनिधिक स्वरूपात जिल्हाधिकारी कार्यालयात बोलविण्यात आले होते. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती यामध्ये सहभागी होण्याचे यापूर्वी आवाहन केले होते. मोठ्या संख्येने ग्रामपंचायती सहभागी झाल्या होत्या.

    कोरोनामुक्त गावांना भेटी देणार : स्वामी

    सोलापूर जिल्ह्यात कोरोनामुक्त सहा गावांना प्रामुख्याने भेटी देऊन त्यांना प्रोत्साहन देणार असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले. ज्या सरपंचांनी यात योगदान दिले आहे. ते कौतुकास्पद असल्याचे सांगितले.

    कोरोनामुक्त गाव अभियानाचा चारवेळा नामोल्लेख

    सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून माझं गाव कोरोनामुक्त गाव अभियान सुरू केले. त्याची दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या भाषणात केली होती. जनतेला संबोधित असताना त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील दोन ग्रामपंचायतींचा गौरव केला होता. त्यानंतर माझ गाव कोरोना मुक्त गाव अभियान राज्यात सुरू करणार असल्याचे जाहीर करून शासन निर्णय काढला. सरपंचाशी आज संवाद साधून त्यांनी कोरोनामुक्त गाव अभियानाचा चार वेळा नामोल्लेख केला. हे अभियान प्रभावीपणे राबवण्याचे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले.