सोलापूर बाजार समितीमध्ये शेतकरी व व्यापाऱ्यांना पोलिसांकडून मारहाण ; बाजार समितीचे संचालक बसवराज इटकळे यांनाही अरेरावीची भाषा

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोरोना चा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी सोशल डिस्टन्स चे पालन न करणे, गाडीवर डबलसीट जाणे, गर्दी करणे यासह इतर कारणामुळे पोलीस प्रशासनाकडून ही कारवाई केली जात आहे. परंतु गुरुवारी सकाळच्या दरम्यान भुसार बाजारांमध्ये आपला शेतमाल व्यापाऱ्यांना दाखवण्यासाठी एका गाडीवर दोन शेतकरी म्हणजेच डबलसीट जात होते.

    सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे कोरोना च्या पार्श्वभूमीवर पोलिसाकडून कारवाई केली जात आहे. परंतु या कारवाईचे रूपांतर मारहाणी पर्यंत गेले असून शेतकरी व व्यापाऱ्यांना पोलिसांनी मारहाण केली आहे. शिवाय बाजार समितीचे संचालक बसवराज इटकळे यांना अरेरावीची भाषा पोलिसांकडून केली जात असल्याची तक्रार शेतकरी व व्यापाऱ्यांनी केली आहे.

    सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोरोना चा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी सोशल डिस्टन्स चे पालन न करणे, गाडीवर डबलसीट जाणे, गर्दी करणे यासह इतर कारणामुळे पोलीस प्रशासनाकडून ही कारवाई केली जात आहे. परंतु गुरुवारी सकाळच्या दरम्यान भुसार बाजारांमध्ये आपला शेतमाल व्यापाऱ्यांना दाखवण्यासाठी एका गाडीवर दोन शेतकरी म्हणजेच डबलसीट जात होते. त्यादरम्यान पोलिसांनी त्यांना थांबवून कारवाई केली. त्यावेळी एका अडत व्यापारी पोलिसांना विनंती केली की शेतकऱ्यांना त्रास देऊ नका. काय कारवाई करायचे असेल तर नियमाप्रमाणे करा. परंतु विनाकारण कोणालाही त्रास देऊ नका असे सांगितले असता संबंधित व्यापाऱ्याला देखील पोलिसांकडून मारहाण करण्यात आली. त्यानंतर काही वेळातच बाजार समितीचे संचालक बसवराज इटकळे हे देखील त्या प्रसंगी आले असता त्यांना देखील तू कोण आहेस, तुझा काय संबंध आहे, तुम्हाला कोणाला सांगायचं ते सांगा असे अरेरावीची भाषा करण्यात आले असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या या अशा जाचाला कंटाळून आम्ही सोमवारी २४ मे पासून भुसार बाजार पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु अशा घटनांमुळे आतापासूनच आम्ही भुसार बाजार पूर्णपणे बंद करणार असल्याचे याप्रसंगी व्यापाऱ्याने सांगितले.

    शेतकरी असो की व्यापारी यांना मारहाण करणे हे पूर्णपणे अयोग्य आहे. घडलेल्या घटने वेळी मी नव्हतो परंतु असे करणे चुकीचे आहे. पोलिसांकडून दादागिरी आणि शेतकरी आणि व्यापाऱ्यांना जर मारहाण होत असेल तर व्यापार पूर्णपणे बंद ठेवू.

    प्रभाकर विभुते, अध्यक्ष भुसार व्यापार संघ

    अरे-तुरे ची भाषा कशासाठी?
    “पोलिसांनी नियमाप्रमाणे कारवाई करावी परंतु अरे तुरे ची भाषा करणे चुकीचे आहे. व्यापार्‍याने व्यवसाय करायचे की पोलिसांसोबत सोबत हुज्जत घालायची. पोलिसांनी बाजार समिती मध्ये शिस्त लावावी परंतु त्यांच्याकडून अर्वाच्च भाषा व धमकी देणे चुकीचे आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी सोमवारपासून सर्व बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.”
    -बसवराज इटकळे, संचालक बाजार समिती