mumbai team in ranji final

रणजी क्रिकेटच्या इतिहासात मुंबईने (Mumbai In Ranji Trophy Final) ४७ व्यांदा फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

    मुंबई: रणजी चषकाच्या (Ranji Trophy 2022) फायनलमध्ये मुंबईने प्रवेश केला आहे. रणजी क्रिकेटच्या इतिहासात मुंबईने (Mumbai In Ranji Trophy Final) ४७ व्यांदा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. पृथ्वी शॉच्या (Prithvi Shaw) नेतृत्वाखालील संघाने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. मुंबई आणि उत्तर प्रदेश यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना अनिर्णित राहिला. मुंबईने पहिल्या डावात ३९३ धावा केल्या होत्या. त्यानंतर उत्तर प्रदेशला १८० धावांत गुंडाळले. दुसऱ्या डावात मुंबईने ४ बाद ५३३ धावांचा डोंगर उभारला. पहिल्या डावाच्या आधारावर मुंबईने फायनलमध्ये प्रवेश केला आहे. आता मुंबई आणि मध्य प्रदेशमध्ये मुकाबला होणार आहे.

    उत्तर प्रदेशचा कर्णधार करण शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हार्दिक तोमर (११३), यशस्वी जायस्वाल (१००) यांची शतके. त्याचबरोबर शॅम्स मुलानी (५०) याच्या अर्धशतकाच्या बळावर मुंबईने पहिल्या डावात ३९३ धावा केल्या. उत्तर प्रदेशकडून कर्णधार करण शर्माने चार विकेट घेतल्या. तर सौरभ कुमारने दोन आणि यश दयाल याने दोन विकेट घेतल्या.  उत्तर प्रदेशचा संपूर्ण डाव अवघ्या १८० धावांमध्येच संपला. उत्तर प्रदेशसाठी शिवम मावीने सर्वाधिक ४८ धावा केल्या. तर माधव कौशिकने ३८ धावांची खेळी केली. मुंबईकडून तुषार देशपांडे, मोहित अवस्थी आणि तनुष कोटियान यांनी प्रत्येकी तीन तीन विकेट घेतल्या. धवल कुलकर्णीला एक विकेट मिळाली.

    पहिल्या डावात २०० पेक्षा जास्त धावांची आघाडी घेणाऱ्या मुंबईची दुसऱ्या डावात दमदार सुरुवात झाली. मुंबईकडून पृथ्वी शॉ आणि यशस्वी जायस्वाल यांनी दमदार सलामी दिली. पृथ्वी शॉ खोऱ्याने धावा खेचत असताना यशस्वी संयमी फलंदाजी करत होता. पृथ्वी शॉ ७१ चेंडूत ६४ धावा काढून बाद झाला. पृथ्वी बाद झाल्यानंतर यशस्वी जायस्वालने मोर्चा सांभाळला. अरमान जाफर आणि यशस्वी जायस्वाल यांनी शतकी खेळी करत मुंबईची आघाडी भक्कम केली. यशस्वी जायस्वलने १८१ आणि अरमान जाफर याने १२७ धावांची खेळी केली. सर्फराज खान (नाबाद ५९) आणि सॅम्स मुलानी (नाबाद ५१) यांनी अर्धशतकी खेळी केली.