नुकसानग्रस्तांना ३ ऑक्टोबरपर्यंत नुकसान भरपाई द्या – खासदार तटकरे

म्हसळा : जूनमध्ये निसर्ग चक्रीवादळात आपद्ग्रस्तांना शासनाने देवु केलेली मदत ४ महिने उलटूनही म्हसळा तालुक्यातील अनेक गावांतील लाभार्थ्यांना अद्याप मिळालीच नसल्याने तालुक्यात मोठ्या प्रमाणावर तक्रारीचा सूर वाढु लागला आहे. याबाबत रायगडचे खासदार सुनिल तटकरे यांनी लागलीच दखल घेत आज  न्यु इंग्लिश स्कुल म्हसळा येथे शासकीय अधिकारी वर्गाची आढावा बैठक घेतली.

येत्या ३ ऑक्टोबरपर्यंत नुकसानग्रस्तांच्या सर्वच तक्रारींचे निवारण करून हा विषयच संपवून टाकावा असा निर्वाणीचा इशारा तालुका महसूल, कृषी आणि पंचायत समिती विभागाचे संबंधितांना अधिकारी वर्गाला देण्यात आला. तालुक्यात एकुण ५४ कोटी रुपयांची आर्थिक मदत महाराष्ट्र शासनाने मंजुर केली आहे. यापैकी३४ कोटी ३ लक्ष रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. ही रक्कम ३ ऑक्टोबरच्या आधीच वितरित करा, अशा अधिकारी वर्गाला सुचना करताना या कालावधीनंतर शासकीय मदत मिळण्याबाबत वंचित नागरिकांच्या तक्रारी माझ्याकडे आल्या तर श्रीवर्धन मतदार संघातील पाच तालुक्यातील ३ ऑक्टोबरच्या आढावा सभेत संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल अशी सूचना वजा इशारा खासदार सुनिल तटकरे यांनी म्हसळा न्यु इंग्लिश स्कूलमध्ये घेतलेल्या आढावा सभेत दिला.

सभेत खासदार सुनिल तटकरे यांनी म्हसळा शहर आणि तालुक्यातील गावात प्रलंबित अति महत्वाच्या विकास कामांबाबत पूर्तता होण्यासाठी टेलिफोन कनेक्टिव्हिटी, विज, पाणी, रस्ते विकास, शाळा दुरुस्ती, शासकीय नुकसान भरपाई आणि कोरोना प्रादुर्भावावर यशस्वीपणे मात करण्यासाठी महत्त्वपूर्ण चर्चा करून लवकरच योग्य कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सांगितले.
यावेळी खासदार सुनिल तटकरे यांचे समावेत जिल्हा परिषदेचे सभापती बबन मनवे,पंचायत समिती सभापती उज्वला सावंत,नगराध्यक्षा जयश्री कापरे,तालुका अध्यक्ष समीर बनकर,माजी सभापती नाझीम हसवारे, सभापती छाया म्हात्रे,पस सदस्य संदीप चाचले, उपनगराध्यक्ष सुहेब हलदे, महिला अध्यक्षा रेश्मा काणसे,संजय कर्णिक,प्रांताधिकारी अमित शेडगे,तहसिलदार शरद गोसावी,मुख्याधिकारी मनोज उकिर्डे,पी.आय.धनंजय पोरे,गटविकास अधिकारी वाय.एम.प्रभे,पाणी पुरवठा अभियंता गांगुर्डे,बीएसएनएल जे. एम.श्री शर्मा,जिओ विभागीय प्रमुख सवजीत शिवगल आदी मान्यवर पदाधिकारी व विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते.
खासदार तटकरे यांनी म्हसळा तालुका आढावा सभेत संपूर्ण तालुक्यातील टेलिफोन कनेक्टिव्हिटी कार्यान्वित करणे आणि कोरोनावर मात करण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी तोंडावर मास्क लावणे व सुरक्षित अंतर ठेवणे अनिवार्य असताना येथे तसे काही होताना दिसत नाही. केवळ १०% लोकच कोरोना प्रादुर्भाव रोखण्या बाबतीत नियम पाळतात त्यामुळे कोरोनाचा समुळ उच्चाटन होणे शक्य होणार नाही. यावर तालुक्यातील संबंधित शासकीय अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी काहिच कार्यवाही करताना दिसत नसल्याने त्यांचेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. येत्या तीन दिवसांत म्हसळा तालुक्यात लोकांना मास्क लावणे अनिवर्य करा अन्यथा कारवाईचा बडगा दाखवा, असे ठोस आदेश तालुका तहसीलदार, नगरपंचायत मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी यांना देताना या कामी पोलिसांची मदत घ्यावी लागली तर तीही घ्या असा सल्ला खासदार तटकरे यांनी दिला. तालुक्यातील शासकीय अधिकारी, कर्मचारी वर्गाची कोरोना टेस्ट कार्यान्वीत असुन शहरातील छोटे, मोठे दुकानदार, व्यावसायिक, मोठया लोकवस्ती मधील प्रत्येक नागरिकांनी अँटीजंट टेस्ट करून घेणे आवश्यक आहे त्या साठी १००० किटची लागलीच उपलब्धता करून देत असल्याचे खासदार यांनी सांगितले.

निसर्ग चक्रीवादळानंतर तालुक्यातील मोबाईल फोन कनेक्टिव्हिटी अनेक ठिकाणी बंद पडली आहे तर अनेक गावात अद्याप नेटवर्क नसल्याने फोनच लागत नाहीत. त्यावर महिन्या भरात ठोस उपाययोजना करावी अशा सूचना बीएसएनएल व जिओ कंपनीच्या अधिकारी वर्गाला करताना त्या कामी केंद्र व राज्य सरकार मार्फत लागेल ती मदत व आवश्यक संपर्क मी करेन असे सांगितले.