स्वयंरोजगारातून ‘त्या’ महिलांना मिळाली जगण्याची नवी दिशा

शरद धुमाळ, भिवंडी : भिवंडी शहरातील देहविक्रय करणाऱ्या महिलांची वस्ती असलेला हनुमान टेकडी परिसर म्हणजे जणूकाही बदनाम वस्ती. या बदनाम वस्तीत नेहमी गिऱ्हाईकाच्या शोधात भिरभिरणाऱ्या नजरांनी खुणावणारे हात

शरद धुमाळ, भिवंडी : भिवंडी शहरातील देहविक्रय करणाऱ्या महिलांची वस्ती असलेला हनुमान टेकडी परिसर म्हणजे जणूकाही बदनाम वस्ती. या बदनाम वस्तीत नेहमी गिऱ्हाईकाच्या शोधात भिरभिरणाऱ्या नजरांनी खुणावणारे हात आता अगरबत्ती पॅकिंग करण्यात गुंतल्याचे चित्र उभे राहिले आहे . कोरोना संसर्ग टाळण्यासाठी येथील महिलांसाठी सामाजिक आरोग्य विषयक काम करणाऱ्या श्री साई सेवा संस्थेच्या प्रमुख स्वाती खान यांच्या पुढाकाराने लॉकडाऊन काळात वस्तीतील महिला देहविक्रय न करता संसर्ग टाळण्यासाठी शपथबद्ध झाल्या . त्या दरम्यान अनेक सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून येथील ५६५ महिलांना वेळोवेळी अन्नधान्य , इतर जीवनावश्यक साहित्याचे वितरण झाले. मात्र लॉकडाऊन कालावधी वाढत गेला तशी येथील महिलांची तगमग वाढली दोन वेळचे जेवण मिळत पण इतर खर्चासाठी , घरभाडे यासाठी कोणाकडे हात पसरणार वेदनेतून महिलांनी आम्हाला काम पाहिजे या साठी तगादा लावला असता संचालिका स्वाती खान यांनी तहसीलदार व उद्योगपती यांच्या माध्यमातून महिला काम मिळवून देण्यासाठी चंग बांधला त्यांच्या या प्रयत्नांना यश आले . येथील महिलांना अगरबत्ती पॅकिंग करण्याचे काम मिळाले, अशी माहिती स्वाती खान यांनी दिली . 

 काम करण्यास उत्सुक असलेल्या निवडक २५ महिलांची प्रथम यासाठी निवड करून त्यांना पंधरा दिवसांचे प्रशिक्षण देऊन त्यांचे काम समाधानकारक राहिल्यास अगरबत्ती पॅकिंगचे काम निरंतर सुरु राहणार असून या प्रशिक्षण कालावधीत महिलांना २१० रुपये प्रतिदिन मानधन स्वरूपात दिले जाणार असून सायंकाळी महिलांना हळद दूध व उकडलेले अंडे असा पौष्टिक आहार देत त्यांना प्राणायामाचे धडे दिले जात आहेत . लॉकडाऊन काळात आम्हाला संस्थेच्या माध्यमातून अन्नधान्य मुबलक मिळाले पण या कामाने आमची पैशांची नड दूर झाली असून हे काम असेच सुरु राहिले तर आपण देहविक्रीच्या व्यवसायातून बाहेर पडू असा विश्वास देहविक्रय करणाऱ्या महिलेने बोलून दाखविला . येथील देहविक्रय करणाऱ्या महिलांसोबत त्यांच्या मुलांनासुध्दा स्वयं रोजगार मिळावा यासाठी त्यांना लायटिंग तोरण , दिवे बनविण्याचे प्रशिक्षण दिले जात असून या सर्व कामातून जगण्याची नवी ऊर्जा मिळत असल्याचे महिलांनी बोलून दाखविले .