प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो

हवामान बदलामुळे समुद्राची पातळी वाढली आहे. त्यामुळे त्याचा परिणाम अधिक होईल व त्यातून नुकसान होण्याचा धोका आहे. या घटनांमागे चंद्रावर निर्माण होणारी हालचाल मुख्य कारण आहे. हे पूर्ण होण्यासाठी १८.६ वर्षाचा कालावधी लागतो. मात्र, हे पहिल्यांदाच घडत नाही. मात्र, चंद्राच्या या १८.६ वर्षाच्या कालावधीत निम्म्या वेळी मोठी भरती ही सामान्य स्तरापेक्षा कमी असेत आणि ओहोटी ही सामान्य प्रमाणापेक्षा अधिक असते

    वॉशिंग्टन: सध्या जगाला कोरोना महामारीने मेटाकुटीला आणले आहे. या संकटाने सर्व त्रस्त असतानाच अजून एका संकटाचा इशारा संशोधकांनी दिला आहे. येत्या ९ वर्षांत पृथ्वीवर सातत्याने महापूर येणार असल्याचे सांगितले आहे. २०१९ मध्ये अमेरिकेच्या अटलांटिक आणि गल्फ कोस्टवर ६०० हून अधिक वेळा मोठ्या प्रमाणावर समुद्राला भरती आली. एवढ्या मोठ्या प्रमाणावर मोठी भरती आल्याने चिंता व्यक्त केली जात होती. मात्र, आता त्याहीपेक्षा अधिक भयंकर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

    निसर्गातील बदलामुळे धोका वाढणार
    पहिल्यांदाच महासागर आणि वातावरणातील बदलामुळे येणाऱ्या पुरांवर अभ्यास करण्यात आला आहे. त्यानुसार, २०३० च्या दशकात अमेरिकेसह इतर देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर पूर येण्याची शक्यता आहे. यासाठी समुद्राची जलपातळी वाढण्यासह चंद्रदेखील कारणीभूत असणार आहे. युनिर्व्हसिटी ऑफ हवाईच्या NASA Sea Level Change Science Team ने संशोधन अभ्यास केला आहे. या संशोधनानुसार, सामान्य प्रमाणात येणाऱ्या भरतीचा स्तर अनेक ठिकाणी असामान्य असण्याची शक्यता आहे. मोठ्या प्रमाणावर समुद्राला भरती अनेकदा येण्याची शक्यता आहे. त्यासाठी चंद्र, पृथ्वी आणि सूर्यादरम्यानची स्थिती महत्त्वाची ठरणार आहे. नासाच्या अहवालानुसार, जेव्हा चंद्र आणि सूर्य एकमेकांशी आणि विशिष्ट मार्गात असतील तेव्हा गुरुत्वकर्षणाच्या परिणामामुळे दररोज किंवा अनेकदा पूर येण्याची शक्यता आहे.

    पुरामुळे मोठे नुकसान

    नासाचे प्रशासक बिल नेल्सन यांनी सांगितले की, सखल भागात समुद्राची पातळी वाढल्याने धोका आणि पुरामुळे अधिक नुकसान होण्याची शक्यता आहे. चंद्राचे गुरुत्वाकर्षण, समुद्राची पातळी वाढणे आणि हवामान बदल यामुळे जगभरातील किनाऱ्यावरील शहरांमध्ये पूर येण्याची घटना वारंवार होऊ शकते. आधीच मिळणाऱ्या माहितीमुळे या भविष्यातील संकटाचा सामना करण्यासाठी तयार राहण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. संशोधक आणि हवाई विद्यापीठातील सहाय्यक प्राध्यापक फिल थॉम्पसन यांनी सांगितले की, समुद्राला महिन्यातून १० ते १५ वेळेस भरती येत राहिल्यास जनजीवन विस्कळीत होऊ शकते. रोजगार आणि आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो.

    चंद्राची हालचाल कारणीभूत
    नासानुसार,हवामान बदलामुळे समुद्राची पातळी वाढली आहे. त्यामुळे त्याचा परिणाम अधिक होईल व त्यातून नुकसान होण्याचा धोका आहे. या घटनांमागे चंद्रावर निर्माण होणारी हालचाल मुख्य कारण आहे. हे पूर्ण होण्यासाठी १८.६ वर्षाचा कालावधी लागतो. मात्र, हे पहिल्यांदाच घडत नाही. मात्र, चंद्राच्या या १८.६ वर्षाच्या कालावधीत निम्म्या वेळी मोठी भरती ही सामान्य स्तरापेक्षा कमी असेत आणि ओहोटी ही सामान्य प्रमाणापेक्षा अधिक असते. दुसऱ्या मध्यात मोठी भरती ही अधिक मोठी होते. तर, ओहोटी कमी होते. चंद्र सध्या दुसऱ्या मध्यात आहे. त्यामुळे २०३० पर्यंत समुद्राची पातळी वाढलेली असू शकते, असा इशारा देण्यात आला आहे.