
dilip thakur
मुंबईची एक ओळख असलेली ‘चित्रपट नगरी’ (अर्थात फिल्म सिटी) अन्य राज्यात (उदाहरणार्थ उत्तर प्रदेश) नेणार/ बसवणार/घडवणार/ आकाराला आणणार अशा अधूनमधून बातम्या येतात आणि सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक व माध्यम क्षेत्रात काही उलटसुलट तर काही सावध प्रतिक्रिया उमटतात. आपण आपल्या चित्रपटसृष्टीच्या दृष्टिकोनातून याचा विचार करायचा तर त्यावरचा ‘फोकस’ कसा दिसेल?
काही काही गोष्टी रुजायला, वाढायला, फोफावायला, पसरायला तशीच सुपीक जमीन, सुविधा, वातावरण, हवामान लागते. चित्रपटसृष्टीला ते मुंबईत भरभरुन मिळाले. मुंबईनेही चित्रपटसृष्टीला भरभरुन दान दिले. ते सांगावे तेवढे थोडेच. पण आता एकूणच मनोरंजन विश्वाचा आजचा आणि उद्याचा विस्तार पाहता अन्य राज्यात चित्रनगरी असा पर्याय कदाचित गरजेचा ठरु शकतो का, असाही एक विचार होऊ शकतो. आजच्या ग्लोबल युगात चित्रपटासह मालिका/रिॲलिटी शो/गेम शो/जाहिराती/व्हिडिओ अल्बम/वेबसिरिज यांच्या निर्मितीत प्रचंड वाढ झाली असून त्याच्या निर्मितीसाठीच्या गरजाही वाढल्या आहेत. आज जगात आपण कोठूनही कोठेही लॅपटॉप, मोबाईल, झूम मिटींग या माध्यमातून एकमेकांशी संपर्क करतोय.
मनोरंजन उद्योगात हे सगळे अत्यावश्यक घटक रुजलेत. मुंबईत गाणे रेकॉर्ड करुन ते ऑनलाईनने विदेशी शूटिंगला पाठवू शकतोय. पण मुळात मुंबईतच हे मनोरंजन विश्व का रुजले/वाढले/फोफावले यासाठी थोडेसे फ्लॅशबॅकमध्ये जायला हवं. आपल्या देशातच जे पहिले स्क्रीनींग झाले तेच मुंबईत आणि तेदेखिल ७ जुलै १८९६ रोजी! फ्रान्सच्या लूमिरी बंधूनी ‘अरायव्हल ऑफ द ट्रेन’ हा लघुपट तेव्हा मुंबईतील वाॅटसन हाॅटेलमध्ये दाखवला. या लघुपटात एकमेव दृश्य होते, एक आगगाडी एका रेल्वे स्टेशनवर येऊन थांबते इतकेच. यानंतर अधूनमधून परदेशातून असे अवघ्या काही मिनिटांचे लघुपट/मूकपट मुंबईत आणि मग अगदी हळूहळू इतर शहरात येऊ लागले.
दादासाहेब फाळके यांनी आपल्याकडचा पहिला चित्रपट ‘राजा हरिश्चंद्र’ निर्माण केला तो ३ मे १९१३ रोजी गिरगावातील कॉरोनेशन चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. तो मूकपट आहे आणि तेव्हापासून आपल्याकडे मूकपटाची निर्मिती सुरु झाली. ‘राजा हरिश्चंद्र’साठी दादासाहेब फाळके यांनी दादरला पूर्व बाजूच्या मथुरा भवनमध्ये या चित्रपटाच्या निर्मीतीसाठी स्टुडिओ उभारला. तेथे त्यानी तब्बल आठ महिने शूटिंग करीत हा चित्रपट पूर्ण केला. यामुळे मुंबईत मूकपटाची निर्मिती सुरु झाली. मग नाशिक शहरात फाळके यांच्या कंपनीने मूकपट निर्मिती सुरु केली. मग पुणे शहरात पाटणकर फ्रेन्डस ॲण्ड कंपनीने संतपट निर्मिती सुरु केली. कोल्हापूरला प्रभात फिल्म कंपनीची स्थापना झाली. प्रभात फिल्म कंपनीनेच व्ही. शांताराम दिग्दर्शित ‘अयोध्येचा राजा’ या आपल्या पहिल्या मराठी बोलपटाची निर्मिती केली. १९३२ सालची ही गोष्ट आहे. ६ फेब्रुवारी १९३२ रोजी हा बोलपट गिरगावातील मॅजेस्टिक थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. तत्पूर्वी अर्देशिर इराणी यांनी ‘आलम आरा’ हा पहिला हिंदी बोलपट मुंबईत निर्माण केला. तो १४ मार्च १९३१ रोजी गिरगावातील मॅजेस्टिक थिएटरमध्येच प्रदर्शित झाला. (या मॅजेस्टीक थिएटरच्या कोणत्याच खाणाखुणा आज शिल्लक नाहीत. त्या जपाव्यात असेही कोणालाच वाटत नाही. सुदैवाने मी गिरगावात लहानाचा मोठा होताना आमच्या खोताची वाडीसमोर मॅजेस्टीक थिएटर होते. ‘आलम आरा’ या चित्रपटाची निर्मिती ग्रॅंड रोड परिसरातील ज्योती स्टुडिओत झाली. (आता तेथे लग्नाचा हॉल आहे). त्या काळात मुंबई, पुणे, कोल्हापूर, मद्रास (आताचे चेन्नई), लाहोर (आता पाकिस्तानात), कलकत्ता (आताचे कोलकत्ता) ही चित्रपट निर्मितीची मुख्य केंद्रे होती. हे माध्यम व व्यवसाय हळूहळू आकार घेत होतो. मद्रासला दक्षिण भारतातील प्रादेशिक भाषेतील चित्रपटांची, तर कोलकत्ता येथे बंगाली चित्रपटाची निर्मिती होई. मुंबई आणि लाहोर येथे हिंदी, तर पुणे आणि कोल्हापूर येथे मराठी चित्रपटांची निर्मिती होई.
मुंबईत नवीन स्टुडिओ उभे राहत होतानाच चित्रपट निर्मितीची वाढ होत गेली. देशाच्या विविध भागातून कलाकार, लेखक, कवि, गीतकार, संगीतकार, दिग्दर्शक, तंत्रज्ञ मुंबईत येऊ लागले. तीसच्या दशकात प्रभात (पुणे शहरात), न्यू थिएटर्स (कोलकत्ता) आणि बॉम्बे टॉकीज (मुंबईत) चित्रपट निर्मितीचा पाया रुजवला. बॉम्बे टॉकीजचा जन्म १९३६ सालचा मुंबईतीलच. तर चित्रपती व्ही. शांताराम यांनी १९४३ साली मुंबईत परेल येथे राजकमल कलामंदिर स्टुडिओची स्थापना केली. त्या काळात चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शकांनी आपला स्वतःचा स्टुडिओ असावा असा जास्त कल राहिला. राज कपूरने १९४८ साली चेंबुरला आर. के. स्टुडिओची स्थापना केली. कमाल अमरोही यांनी अंधेरीच्या महाकाली परिसरात भव्य कमालीस्थान स्टुडिओ उभारला. शशधर मुखर्जी यांनी अगोदर गोरेगावला फिल्मीस्थान, तर अंधेरी पश्चिमेला आंबोली येथे फिल्मालय स्टुडिओ उभारला. मेहबूब खान यांनी वांद्र्याला मेहबूब स्टुडिओ उभारला. तर रामानंद सागर, शक्ती सामंता, प्रमोद चक्रवर्ती, एफ. सी. मेहरा आणि आत्माराम या पाच निर्मात्यांनी अंधेरी कुर्ला रोडवर नटराज स्टुडिओ उभारला. दादरला चंदुलाल शहा यांचाच रणजित स्टुडिओ, साकी नाकाजवळ हेमंत कदम या मराठी माणसाने चांदिवली स्टुडिओ उभारला. गुलशन रॉय यांचा त्रिमूर्ती स्टुडिओ दहिसर येथे सुरु झाला. दादरचा रणजीत आणि रुपतारा अंधेरीतील सेठ स्टुडिओ, मालाडचा बॉम्बे टॉकीज, तसेच आणखीन काही नावे सांगायची तर कारदार, श्रीकांत, वेस्टर्न, श्रीसाऊंड, सेन्ट्रल, प्रकाश, वसंत, आशा, मिनर्व्हा वगैरे वगैरे स्टुडिओ बंद पडले. अंधेरीतील सेठ स्टुडिओचे उद्घाटन चेतन आनंद दिग्दर्शित ‘कुदरत’ (१९८०) या चित्रपटाने झाल्याचे आठवतेय. हा मुंबईतील पहिला आणि एकमेव वातानुकूलित स्टुडिओ होता.
या सगळ्यात १९७८ साली गोरेगाव पूर्व भागात आपल्या राज्य शासनाची अतिशय विस्तीर्ण आणि अनेक सुविधा असलेली चित्रनगरी उभी राहिली. आघाडीच्या निर्मिती संस्थाही मुंबईत होत्या. व्ही. शांताराम यांची राजकमल फिल्म, राज कपूरची आर. के. फिल्म, बिमल रॉय यांचे बिमल रॉय प्रॉडक्शन्स, आनंद बंधुंचे नवकेत वगैरे अनेक. त्या काळात मराठी चित्रपटाची निर्मिती कोल्हापूर, मग पुणे आणि मुंबईत होई. आता मुंबई मराठी चित्रपट निर्मितीचे प्रमुख केंद्र आहे. ऐंशीच्या दशकाच्या सुरुवातीला रंगीत दूरदर्शन व व्हिडिओ येताना आजच थिएटरमध्ये रिलीज झालेला चित्रपट आजच चोरट्या मार्गाने घरी दिसू लागला आणि चित्रपटसृष्टीतील वातावरणाने वेगळे वळण घेतले. नव्वदच्या दशकात चित्रपटसृष्टी आणि अंडरवर्ल्ड या नात्याने आणखीन गोची केली आणि जुन्या चित्रपटांचा शौकिन १९७५ सालापर्यंतचा सिनेमा हाच खरा असे मानू लागला.
नामकरण “बॉलिवूड” झाले. हे उघड उघड हॉलीवूडची नक्कल होते आणि नवीन पिढीला त्यातच हर्षवायू होऊ लागला. खरं तर जोपर्यंत “फस्ट डे फर्स्ट शो”चा पब्लिक रिपोर्ट येत नाही तोपर्यंत सिनेमाचे नक्की काय होणार याचे उत्तर कोणाहीकडे नसते. उत्तम आणि खर्चिक मार्केटिंग म्हणजे घवघवीतपणे यश असे असते तर ‘सर्कस’, ‘लालसिंग चढ्ढा’, ‘८३’, ‘ठग्ज ऑफ हिन्दुस्तान, महाराणा प्रताप, राम सेतू अशा चित्रपटांकडे अतिशय वेगाने रसिकांनी पाठ फिरवली नसती.
मुंबईत चित्रपटसृष्टी प्रचंड रुजताना त्यात भलत्यसलत्या, अनिष्ट वृत्ती आणि गोष्टीही मिसळल्या. मालिकांपासून वेबसिरिज, ओटीटीपर्यंत निर्मितीचे पीक आल्याने मनोरंजन क्षेत्राची पाळेमुळे आणखीन खोलवर पसरली. दक्षिणेकडील स्थित्यंतर सांगायचे तर, चेन्नईत तमिळ, त्रिवेंद्रमला मल्याळम, बंगलोरला कन्नड, तर हैद्राबादला तेलगू यांची चित्रपटसृष्टी फोफावली. बंगाली, हरियाणवी, राजस्थानी, भोजपुरी, गुजराती, कोंकणी, तुळू, पंजाबी वगैरे मिळून एकूण बावीस-तेवीस लहान मोठ्या भाषेतील चित्रपट निर्माण होतात. पण जगभरात भारतीय चित्रपट म्हटले की, ‘मुंबईचे बॉलिवूड अथवा चित्रपटसृष्टी’ हीच ओळख अनेक कारणांमुळे अधिकाधिक घट्ट झाली आहे, ती सहजपणे बदलणे शक्यच नाही. तेव्हा मुंबईतील ही चित्रपटसृष्टी/ मायानगरी/ स्वप्नांची दुनिया/ ग्लॅमरस जग येथेच पाय रोवून ठामपणे उभे राहून वाटचाल करणार हे निश्चित.
-दिलीप ठाकूर
glam.thakurdilip@gmail.com