
नागरिकांनो फळ खाताय, मग हा Video बघाच...! (Photo Credit- X)
मिळालेली माहिती अशी की, संबंधित विक्रेते फळांवर ‘रेटिनॉल’ नावाचे विषारी औषध लावत होते. हा प्रकार स्थानिक नागरिक कुणाल साळुंखे यांच्या लक्षात आला. त्यांनी या संपूर्ण घटनेचे चित्रीकरण केले आणि तत्काळ मालाड पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली. तक्रारीसोबतच त्यांनी पुराव्यादाखल पोलिसांकडे व्हिडिओ रेकॉर्डिंगही सुपूर्द केले. यामध्ये फळ विक्रेते चक्क उंदरांच्या औषधाचा वापर फळांवर करताना स्पष्ट दिसत होते.
तक्रारीचे गांभीर्य ओळखून मालाड पोलीस ठाण्याच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाड टाकली. प्राथमिक चौकशी दरम्यान, आरोपींनी आपली चूक कबूल केली. “फळांना उंदीर कुरतडतात, त्यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी आम्ही ही औषधे लावत होतो,” अशी धक्कादायक कबुली आरोपींनी दिली आहे. फळे थेट खाल्ली जात असल्याने, अशा प्रकारे विषारी औषधांचा वापर करणे हे सार्वजनिक आरोग्यासाठी अत्यंत घातक आणि बेकायदेशीर आहे.
या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. त्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत: १. मनोज कुमार केसरवानी २. बिपिन केसरवानी दोन्ही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १२५, २७४, २७५ आणि २८६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्यांचे दुकान सील केले असून पुढील तपास सुरू केला आहे. अन्नामध्ये भेसळ किंवा विषारी पदार्थांचा वापर खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.
पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, “खाद्यपदार्थांच्या बाबतीत अशी निष्काळजी करणे हा गंभीर गुन्हा आहे. या प्रकरणातील धागेदोरे तपासले जात असून, गरज पडल्यास अन्न व औषध प्रशासनालाही पुढील कारवाईसाठी सूचित केले जाईल.” या घटनेमुळे मुंबईत खळबळ उडाली असून, नागरिकांनी बाजारपेठेतून फळे किंवा भाजीपाला खरेदी करताना तो स्वच्छ धुवून वापरण्याचे आवाहन आरोग्य तज्ज्ञांनी केले आहे.
BMC Budget 2026-27: मुंबईचा कायापालट होणार का? अर्थसंकल्पात ८०,९५२ कोटींची तरतूद