मनोजकुमारची मला सर्वात आवडती गोष्ट म्हणजे, त्याचे गाण्याचे अतिशय जबरा आणि दृश्य माध्यमाचा उत्तम वापर केलेले टेकिंग, शब्द सौंदर्य व दृश्य सौंदर्याचा रुपेरी मिलाप.
मेरे देश की धरती, सोना उगले, उगले हीरे मोती (उपकार)
पूरवा सुहानी आयी है, पुरवा (पूरब और पश्चिम)
भारत का रहने वाला हूं, भारत की बात बताता हू (पूरब और पश्चिम)
एक प्यार का नगमा है… जिंदगी और कुछ भी नही (शोर)
पानी रे पानी तेरा रंग कैसा (शोर)
….. ही त्याच्या दिग्दर्शनातील चित्रपटातील त्याचा सर्वोत्तम टच असलेली “टॉप फाईव्ह” गाणी.
ही ‘हिट लिस्ट ‘ आणखीन वाढवता येईल. यातील ‘शोर’च्या (रिलीज १५ सप्टेंबर १९७२) च्या प्रदर्शनास पन्नास वर्षे पूर्ण कधी बरे झाली हे त्याच्या सर्वकालीन सदाबहार गाण्यांमुळे समजलेही नाही. आणि हे या चित्रपटाचे यश आहे. चित्रपटात गीत संगीत नृत्य म्हणूनच महत्त्वपूर्ण. ते त्या चित्रपटाचे अस्तित्व कायमच दाखवते.
‘अभिनेता ‘ मनोजकुमारचे वेगळे मूल्यमापन होते. अगदी त्याच्या रुपेरी पडद्यावरील अभिनय आणि वावर यावर दिलीपकुमार शैलीचा प्रभाव असलेला दिसतो यापासून देशभक्त नायक भारतकुमार अशी प्रतिमा असा तो ग्राफ आहे. पहिल्यात टीकेचा सूर तरी वाटचाल धीमी तरी विश्वसनीय. त्या काळातील आघाडीच्या अनेक दिग्दर्शकांच्या चित्रपटात तो आहे अथवा होता.
त्याच्याबद्दलच्या दुसर्याे व्याख्येत चाहत्यांकडून आत्मियता, कौतुक आणि टीकाकारांकडून काहीशी हेटाळणी. तरी यशाचे गमक त्याच देशभक्त नायक याच प्रतिमेत आहे. त्याच्या दिग्दर्शनातील पहिला चित्रपट ‘उपकार’ (१९६७), नंतरचा ‘पूरब और पश्चिम’ (१९६९) यातील त्याच्या व्यक्तीरेखेचे नाव ‘भारत’ असल्याचे रसिकांना आवडले आणि तीच त्याची ओळख व इमेज झाली. म्हटलं तर योगायोग. पण पथ्यावर पडलेला. ही इमेज त्याला केवल कश्यप निर्मित व एस. राम शर्मा दिग्दर्शित ‘शहीद’ (१९६५) च्या यशाने आणि त्यात त्याने साकारलेल्या भगत सिंग या व्यक्तिरेखेला रसिकांची दाद मिळाली यातून तयार झाली.
मनोजकुमारच्या एकूणच दिग्दर्शनाचा पट मांडताना ‘शोर’ बराच वेगळा. आणि त्याचा खास टच असलेला चित्रपट. त्याची गोष्ट आज कदाचित फारच योगायोगाने भरलेली वाटेल. पण पन्नास वर्षांपूर्वीच्या रसिकांना ती विलक्षण भारावून टाकणारी होती. प्रत्येक काळाचे काही फंडे असतात आणि ते तात्कालिक काळानुसार योग्यही असतात. हीच सिनेमा संस्कृती आहे.
‘शोर’ची थोडक्यात गोष्ट अशी, आपल्या मुलाला (मा. सत्यजित) अचानक सामोऱ्या आलेल्या रेल्वे अपघातातून वाचवण्याच्या प्रयत्नात त्याच्या आईचा (नंदा) दुर्दैवाने मृत्यू होतो. तिचा हा जीवघेणा अपघात पाहताना विलक्षण आक्रोश केल्याने मुलाची वाचा जाते. तो बोलू शकत नाही. पत्नीचा धक्कादायक मृत्यू आणि मुलावरचे संकट यामुळे शंकर (मनोजकुमार) हादरतो.
मुलाच्या उपचारासाठी खूपच मोठा खर्च असतो. तेवढे पैसे आणणार कुठून? एकिकडे तो बराच वेळ सायकल चालवत पैसे मिळव वगैरे वगैरे गोष्टी करतो. दुसरीकडे त्याला आपल्या आई (कामिनी कौशल) व बहीणीची (बेबी नाझ) साथ आहे. दुसरीकडे त्याला खान बादशाह (प्रेमनाथ) आणि रानी (जया भादुरी) मदत करतात. याशिवाय तो नोकरीही करतो. कधी त्या कारखान्यात टाळेबंदी होते म्हणून शंकर व्यथित होतो. कुठे सहकार्य तर कुठे अडथळेच. यातून मार्ग काढत काढत तो मुलाच्या उपचारासाठी पैसे जमवतो. अगदी मुलावर यशस्वी उपचार होतात. तो बोलूही लागतो. पण त्याचा आवाज ऐकण्यासाठी अतिशय जीवापाड प्रयत्न केलेल्या शंकरचा कारखाना नेमका तेव्हाच सुरु होतो, त्यात अपघातात तो सापडतो आणि त्यात तो दुर्दैवाने बहिरा होतो.
हा भावूक क्लायमॅक्सच विलक्षण भावस्पर्शी (टचिंग) ठरला. रसिकांना गुंतवून ठेवत ठेवत अखेरीस अनपेक्षित धक्का देण्यात मनोजकुमार यशस्वी ठरला आणि येथेच पिक्चरचे यश पक्के झाले. त्या काळात अशा प्रकारच्या सामाजिक चित्रपटांचे वातावरण होते. राजेश खन्नाचा जबरा क्रेझ असलेला हा काळ होता. त्यात ‘शोर’ फिट्ट बसला आणि हिट ठरला.
मुंबईत मेन थिएटर ऑपेरा हाऊसला रौप्यमहोत्सवी यश संपादले. विशेष म्हणजे, उपकार, पूरब और पश्चिम यांनीही याच ऑपेरा हाऊसला ज्युबिली हिट यश संपादन केले होते. ‘शोर’ने ज्युबिली हिटची हॅटट्रिक केली. इतकेच नव्हे तर नंतरचा ‘रोटी कपडा और मकान’ (१९७४) नेही येथेच पन्नास आठवड्यांचा मुक्काम करताना दक्षिण मुंबईतील आम्हा चित्रपट रसिकाना मनोजकुमारचा चित्रपट म्हणजे हमखास ऑपेरा हाऊसच असे नाते घट्ट झाले. (‘उपकार’चे सुरुवातीला मेन थिएटर लिबर्टी होते इतकेच.) ‘शोर’मध्ये मदन पुरी, असरानी, मनोरमा, मीना टी., मनमोहन, राज मेहरा, नाना पळशीकर, कृष्ण धवन, कुलजीत, व्ही. गोपाल इत्यादींच्या भूमिका आहेत. चित्रपटाचे छायाचित्रण नरिमन इराणी यांचे आहे. या चित्रपटाची काही वर्षांनी ‘ओसई’ या नावाने तमिळमध्ये रिमेक आली. चित्रपट हिट म्हणजे हे असे होणारच.
‘शोर’ची थीम मनोजकुमारच्या देशभक्तीच्या हुकमी फॉर्म्युल्यापेक्षा निश्चित वेगळी. ‘रोटी कपडा और मकान’पासून मनोजकुमार फिल्मी झाला. पब्लिकला अमूकतमूक आवडेल असा समज करुन घेऊन देशभक्तीपर संवाद वगैरेवर भर देऊ लागला. त्याचा ‘क्रांती’ ( १९८१) चक्क सलिम जावेदची पटकथा व संवाद असलेला पीरियड सिनेमा. काही प्रसंग हास्यास्पद.
सलिम जावेदकडून हा मागणी तसाच पुरवठा. मनोजकुमारच्या भारतकुमार प्रतिमेवर प्रेम असलेल्या त्याच्या हुकमी क्राऊडने पिक्चर हिट केले आणि एकदा जोरात सुरु असलेला चित्रपट मग बरेच आठवडे चालतंच राहतो. मुंबईत मेन थिएटर अप्सरामध्ये पन्नास आठवड्यांचा भारी मुक्काम केला, बरं का?
मनोजकुमार यानंतर आपल्याच देशभक्त नायक या प्रतिमेत अडकला आणि थीमपेक्षा हुकमी दृश्ये (नायिका पावसात चिंब भिजणे, एकादा बलात्कार वगैरे) यात गडबडला. याचा परिणाम म्हणजे, त्याच्या दिग्दर्शनातील ‘क्लर्क’ ( १९८९), ‘जयहिंद’ (१९९६) दणकून आपटले. मला आठवतंय, ‘जयहिंद’च्या कमालीस्तान स्टुडिओतील शूटिंग रिपोर्टीसाठी आम्हा काही सिनेपत्रकारांना सेटवर बोलावले असता मनिषा कोईरालाची बराच काळ वाट पाहून मनोजकुमार कातावला होता. असे अनेक दिवस झाल्याने त्याने तेव्हाच ‘पुरे झाले दिग्दर्शन’ असे ठरवले.
गाण्याचे व्यक्तिमत्व पडद्यावर खुलवणे हे त्याच्या यशस्वी दिग्दर्शनातील सर्वात मोठे वैशिष्ट्य. ‘शोर’मधील संतोष आनंद यांनी लिहिलेली एक प्यार का नगमा है (पार्श्वगायक लता मंगेशकर व मुकेश), इंद्रजितसिंग तुलसी यांनी लिहिलेली जीवन चलने का नाम (मन्ना डे, महेंद्र कपूर व श्यामा चित्तर), पानी रे पानी तेरा रंग कैसा (लता मंगेशकर व मुकेश), वर्मा मलिक लिखित शहनाई बजे ना बजे (लता मंगेशकर) ही सगळी गाणी सहज ओठांवर येतात आणि गुणगुणत असताना त्यांचे पडद्यावरचे सादरीकरण डोळ्यासमोर येतेच हे मनोजकुमारच्या दिग्दर्शन व संकलनाचे यश आहे. (मनोजकुमारला या चित्रपटासाठी संकलनाचा फिल्म फेअर पुरस्कार प्राप्त झाला.) विशेष म्हणजे, पहिल्या दोन चित्रपटांना (उपकार आणि पूरब और पश्चिम) कल्याणजी आनंदजी यांचे संगीत असूनही आणि गाणी आजही लोकप्रिय असूनही ‘शोर’साठी मनोजकुमारने लक्ष्मीकांत प्यारेलाल यांची निवड केली.
विशेष म्हणजे पानी रे पानी, जीवन चलने का नाम, एक प्यार का नगमा अशा तीन गाण्यात आयुष्याचे तत्वज्ञान आहे आणि ते सोप्या शब्दात व साध्या चालीत आले आहे. ‘शोर’ पन्नास वर्षांनंतरही आजचा चित्रपट म्हणून रसिकांसमोर ठेवलंय… असे अनेक चित्रपट थिएटरमधून उतरले तरी रसिकांच्या मनात कायमचे घर करतात. मग त्याचा ‘शोर’ कितीही का असेना. त्यात असलेला मनोरंजनाचा ‘जोर’ महत्वाचा.
दिलीप ठाकूर
glam.thakurdilip@gmail.com