आतिशी मंत्रिमंडळात गेहलोत यांच्या जागी रघुविंदर शौकीन यांना स्थान; आपचे लक्ष आता जाट नेत्यांवर...
नवी दिल्ली : दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षातून कैलाश गेहलोत हे बाहेर पडले आहेत. गेहलोत हे विद्यमान आतिशी सरकारमध्ये परिवहन मंत्रालयाचा कार्यभार सांभाळत होते. मात्र, त्यांनी आपमधून बाहेर पडत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. असे असताना आता त्यांच्या जागी रघुविंदर शौकीन या जाट समाजातील नेत्याला स्थान देण्यात आले आहे.
संबंधित वाचा : दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वीच केजरीवालांना मोठा धक्का; चक्क परिवहनमंत्र्यांनी सोडला पक्ष
दिल्लीचे परिवहनमंत्री आणि आम आदमी पक्षाचे ज्येष्ठ नेते असलेल्या कैलाश गेहलोत यांनी ‘आप’च्या प्राथमिक सदस्यत्वाचा नुकताच राजीनामा दिला. कैलाश गेहलोत यांच्या राजीनाम्यानंतर आम आदमी पार्टीने (आप) नवीन जाट कार्ड खेळत रघुविंदर शौकीन यांना आतिशी यांच्या मंत्रिमंडळात स्थान दिले आहे. रघुविंदर शौकीन हे पश्चिम दिल्लीतील नांगलोई जाट मतदारसंघातून पक्षाचे आमदार आहेत. दुसरीकडे, कैलाश गेहलोत यांनी अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
आम आदमी पक्षासोबत बराच काळ घालवल्यानंतर कैलाश गेहलोत आता निवडणुकीपूर्वी भाजपसोबत आहेत. दिल्ली सरकारचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी रघुविंदर शौकीन यांचा परिचय करून देताना सांगितले की, ‘आम आदमी पार्टी हा सुशिक्षितांचा पक्ष आहे आणि त्यात सामील असलेल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये क्षमता आहे. अरविंद केजरीवाल स्वतः सुशिक्षित आहेत आणि त्यांची टीम सुशिक्षित आहे. रघुविंदर हे सिव्हिल इंजिनियर होते. यापूर्वी ते दोनदा आमदार आणि दोनदा समुपदेशक राहिले आहेत. त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात खूप काम केले आहे आणि त्याचबरोबर दिल्लीच्या ग्रामीण भागात त्यांचा खूप प्रभाव आणि कार्य आहे’.
‘आप’ने सर्व समाजाला घेतलं सोबत
अरविंद केजरीवाल यांचा मंत्रिमंडळात समावेश केल्याबद्दल त्यांचे आभार मानताना रघुविंदर शोकीन म्हणाले की, ‘आम आदमी पार्टीने संपूर्ण समाजाला सोबत घेतले आहे. तर भाजप जाटांच्या विरोधात आहे. शेतकऱ्यांचे आंदोलन असो की कुस्तीपटूंचा मुद्दा असो की हरियाणातील निवडणुका. भाजपने हरियाणातील लोकांना जाट आणि बिगर-जाट अशी विभागणी करण्याचे काम केले. आम आदमी पक्षाने नेहमीच राज्याच्या विकासासाठी काम केले आहे.
‘राज्यभर विकासकामे करत राहीन’
मला मिळालेल्या संधीबद्दल नागलोईची जनता आम आदमी पार्टीचे आभार मानेल आणि मी संपूर्ण राज्यात विकासासाठी काम करत राहीन, असे रघुविंदर शौकीन म्हणाले. मी सर्वांचे आभार मानू इच्छितो आणि सांगू इच्छितो की मी माझे काम पूर्ण प्रामाणिकपणे आणि सत्यतेने करत राहीन, असेही त्यांनी सांगितले.
संबंधित बातम्या : संविधान बदलण्याची घोषणा भाजपला पडणार भारी? निवडणूक आयोगाकडे काँग्रेस नेत्यांची तक्रार