
bihar assembly election
बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय जनता दलाने (आरजेडी) लढवलेल्या जागांच्या संख्येचा थेट परिणाम पक्षाच्या मतांच्या टक्केवारीवर झाल्याचे विश्लेषणातून समोर आले आहे. तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली आरजेडीने महागठबंधनात सर्वाधिक १४३ जागांवर उमेदवार उभे केले, तर उर्वरित १०० जागा इतर मित्रपक्षांनी लढवल्या.
दुसरीकडे, एनडीएमधील दोन प्रमुख पक्ष — भाजप आणि जेडीयू — यांनी फक्त १०१-१०१ जागा लढवल्या. त्यामुळे अधिक जागांवर लढण्याचा फायदा आरजेडीला मतांच्या टक्केवारीत झाला आणि पक्षाने २३% मते मिळवली. भाजप आणि जेडीयूच्या एकत्रित मतांपेक्षा आरजेडीने तब्बल ४२ लाख जास्त मते मिळवल्याचे डेटा दर्शवतो.
जागा जिंकण्याच्या दृष्टीने ही रणनीती उलटी ठरल्याचे विश्लेषकांचे मत आहे. कारण, विजयासाठी प्रतिस्पर्ध्यापेक्षा फक्त एक मत जास्त मिळाले तरी जागा मिळते. उदाहरणार्थ, एखादा उमेदवार २५,००० मतांनी जिंकल्यास पक्षाच्या एकूण मतदानाच्या टक्केवारीत वाढ होते, परंतु जागा केवळ एकच वाढते. त्यामुळे मोठ्या फरकाने झालेल्या विजयांचा जागा संख्येवर कोणताही अतिरिक्त फायदा होत नाही.
राजकीय समीकरण पहाताच, एनडीएमध्ये भाजप आणि जेडीयू हे दोन्ही प्रभावी पक्ष असून, त्यांचे मतांचे प्रमाण जवळपास सारखे आहे. भाजपला २०.०८%, जेडीयूला १९.२५% तर एलजेपी आरव्हीला ४.९७% मते मिळाली.
याउलट, महागठबंधनात आरजेडी हा एकमेव मोठा मतांचा पक्ष आहे. काँग्रेसला केवळ ८.७१% आणि सीपीआय (एमएल) (एल) ला २.८४% मते मिळाली. महागठबंधनातील “टॉप-३” पक्षांचा एकत्रित मतांचा वाटा फक्त ३५% आहे, तर एनडीएमधील तीन सर्वात मोठ्या पक्षांचा एकत्रित मतांचा वाटा तब्बल ४५% आहे. यावरून एनडीए आणि महागठबंधन यांच्यातील मतांच्या ताकदीतील मोठा फरक स्पष्टपणे दिसून येतो.