
नवी दिल्ली – जगात सर्वात तरुणांचा देश अशी ओळख असलेल्या भारतात, परिस्थिती आणि जगण्यातील पराभव स्वीकारणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढते आहे. एनसीआरबीच्या अहवालानुसार २०२० साली देशात १ लाख ५३ हजार ५२ जणांनी आत्महत्या केल्या. यात ६७ टक्के म्हणजे एक लाख ६ हजार आत्महत्या करणारे हे १८ ते ४५ वयोगटातील आहेत. यातही १८ ते ३० वयोगटातील सर्वाधिक ५२ हजार ७०२ जणांनी आत्महत्या केल्या आहेत.
जगाचा विचार केला तर परिस्थिती विपरीत आहे. इस्न्टिट्यूट ऑफ हेल्थ मॅट्रिक्स अँड इव्हेल्यूशनच्या एका अहवालानुसार जगभरात ७० वर्षांहून अधिक वय असणाऱ्यांमध्ये आत्महत्येचं प्रमाण सर्वाधिक आहे.
एका लाखाच्या लोकसंख्येत आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण म्हणजे सुसाईड रेट. यात भारताची स्थिती अमेरिका आणि रशियापेक्षा दिलासादायक आहे. २०२० मध्ये हा सुसाईड रेट देशात १०.४ आहे. तर अमेरिकेत तो १६.१ तर रशियात २५.१ आहे.
देशात ५८ टक्के आत्महत्या गळफास घेऊन, परदेशात सर्वाधिक आत्महत्या विष प्राशन करुन देशात २०२० मध्ये ८८,४६० जणांना गळफास लावून आत्महत्या केली आहे. तर विष पिऊन आत्महत्या करणाऱ्यांची संख्या ३८,३३६ इतकी आहे. जगातील इतर देशांत सर्वाधिक आत्महत्या या विषप्राशन करुन होतात.