
'रेस्टॉरंट्स बंद पडतील अशी वक्तव्ये करू नका'; 'सावजी'वरून बावनकुळे आक्रमक
मुंबई : सावजी हा केवळ व्यवसाय नसून विदर्भाची शान आहे. हजारो कुटुंबांचा उदरनिर्वाह या व्यवसायावर अवलंबून आहे. त्यामुळे सावजी रेस्टॉरंट्स बंद पडतील किंवा उद्योगालाच करणारी बदनाम वक्तव्ये अधिकाऱ्यांनी करू नये, असा इशारा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला. अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सावजी मटणाबाबत केलेल्या वक्तव्याचा समाचार घेत बावनकुळे यांनी सावजी व्यवसायाच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे असल्याचे स्पष्ट केले.
तुकाराम मुंढे यांनी अमरावती येथे आयोजित कार्यक्रमात ‘मी जर सावजी मटण खाल्ले, तर महिनाभर आजारी पडेन आणि मला रुग्णालयात दाखल व्हावे लागेल’ असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे सावजी रेस्टॉरंट चालक आणि व्यावसायिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर गुरुवारी मुंबईत पत्रकारांशी बोलताना बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांच्या अशा सरसकट वक्तव्यांवर तीव्र आक्षेप नोंदवला. विदर्भात येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला आणि नागरिकाला सावजी जेवणाचा आस्वाद घ्यावासा वाटतो. इतकी या खाद्यसंस्कृतीची लोकप्रियता आहे. आज देशासह परदेशातही सावजी खाद्यपदार्थांना मोठी मागणी असताना, अधिकाऱ्याने उद्योगावर नकारात्मक टिप्पणी करणे योग्य नाही, असे बावनकुळे यांनी सांगितले.
दरम्यान, विदर्भातील हलबा समाजाची वेगळी ओळख म्हणून चवदार मांसाहारी व शाकाहारी जेवण आहे. समाजाच्या लोकांनी पोटापाण्यासाठी परंपरागत उत्कृष्ट पद्धतीचे जेवणासाठी नागपूरसह विदर्भात सावजी भोजनालय थाटली. कोणतीही भाजी तिखट नसून चवदार आणि आरोग्यदायी आहे.
भारतात नागपूरचे सावजी भोजनालय सुप्रसिद्ध
सावजी नावाने काही तथाकथित लोकांनी भोजनालय थाटून आमची संस्कृती व परंपरा बदनाम करण्याचा प्रयत्न केला. त्यात सनदी अधिकारी तुकाराम मुंढे आहे. तुकाराम मुंढेंनी हलबा समाजातील कोणाच्याही घरी जाऊन जेवन केल्यानंतरच प्रतिक्रिया द्यावी. भारतात नागपूरचे सावजी भोजनालय सुप्रसिद्ध आहेत म्हणून नागपुरात येणाऱ्या बहुतांश नागरिकांना सावजीचे जेवण आवडते, असे सांगून अॅड. नंदा पराते यांनी मुंढे यांचा निषेध केला.