
लोकसभा निवडणुकीचे निकाल मंगळवारी (४ जून) जाहीर झाला. या निकालानंतर भाजपला अपयशाला सामोरं जावं लागलं. महाराष्ट्रातील या लोकसभा निवडणुकीत भाजपाला केवळ 17 जागा मिळाल्या आहेत, तर विरोधी काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडीला 48 पैकी 30 जागांवर दणदणीत विजय मिळाला आहे. आता निवडणूकीनंतर महाराष्ट्रात कोणाचा डंका वाजणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
निवडणुकीच्या निकालापूर्वी भाजप 45 प्लसचा नारा घेऊन महायुती, शिंदे गट आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीची साथ घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरले. तर दुसरीकडे कॉंग्रेस, पक्षफुटीने घायाळ झालेले शरद पवार आणि ठाकरे गट यामुळे राज्याची लोकसभा निवडणूक रंगतदार होणार हे फिक्स होते. राज्यात महायुतील केवळ 17 जागांवर विजय मिळाला असून महाविकास आघाडीने 30 जागांवर मुसंडी मारली आहे. त्यामध्ये सर्वाधक जागा या कॉग्रेसला मिळाल्या असून काँग्रेसच्या या यशामध्ये विदर्भाचा मोठा वाटा आहे. विदर्भातून काँग्रेसला पाच जागा मिळाल्या आहेत.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत पाहिलं तर राज्यातील भाजप खासदारांची संख्या निम्म्याहून कमी झाली आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) महाराष्ट्रातील 45 पेक्षा जास्त मतदारसंघ जिंकण्याच्या आपल्या लक्ष्यापासून खूपच कमी पडली आणि यावेळी त्यांना केवळ 17 जागा मिळाल्या.
महाराष्ट्रात भाजपची परिस्थिती काय?
महाराष्ट्रात भाजपबद्दल बोलायचं झालं तर, भाजपला केवळ 9 जागा मिळाल्या आहेत, ज्या 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राज्यात जिंकलेल्या 23 जागांपेक्षा खूपच कमी आहेत. तर शिवसेनेने (शिंदे) 7 जागा जिंकल्या आहेत. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ 1 जागा मिळाली आहे. एवढेच नाही तर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना बारामतीत शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. राज्यात काँग्रेसने 13 जागा जिंकल्या आहेत. तर 2019 मध्ये राज्यात पक्षाने मिळविलेल्या एका जागेपेक्षा लक्षणीय आहे, तर शिवसेनेने (UBT) 9 आणि NCP (शरदचंद्र पवार) 8 जागा जिंकल्या आहेत.
काँग्रेसमध्ये असलेले विशाल पाटील यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवून सांगलीची जागा जिंकली. महाराष्ट्रात 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने 23 जागा जिंकल्या होत्या, तर त्यांचा तत्कालीन मित्रपक्ष शिवसेना (अविभाजित) 18 जागा जिंकल्या होत्या. तत्कालीन अविभाजित राष्ट्रवादीने चार मतदारसंघ जिंकले होते, तर काँग्रेसला केवळ एक जागा जिंकता आली होती.
उद्धव ठाकरेचं काय म्हणणं?
शिवसेनेच्या (यूबीटी) कामगिरीवर खूश असलेले अध्यक्ष उद्धव ठाकरे म्हणाले की, युतीसाठी पंतप्रधानपदाचा चेहरा ठरवण्यासाठी ‘इंडिया’ युतीची आज, म्हणजे बुधवारी बैठक होणार आहे. सर्वसामान्यांनी आपली ताकद दाखवून दिली आहे. विरोधकांनी केंद्रात सरकार स्थापनेचा दावा केला पाहिजे.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
दुसरीकडे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाच्या कामगिरीवर सांगितले की, महाराष्ट्रात एनडीएच्या अशा कामगिरीचे कारण म्हणजे निवडणुकीनंतर भाजप राज्यघटना बदलेल असा विरोधकांचा प्रचार आहे. फडणवीस यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले, “पण निवडणुकीत जनतेचा जनादेश त्याच स्वरूपात स्वीकारावा लागेल. आता आम्ही सखोल आत्मपरीक्षण करू आणि पुढील विधानसभा निवडणुकीत झालेल्या नुकसानाची भरपाईही करू.” असं देव्रेंद्र फडणवीस म्हणाले.