
महायुतीत भाजपच असणार मोठा भाऊ; शिवसेना, राष्ट्रवादीला किती जागा मिळणार? १० दिवसांत घोषणा होणार
Maharashtra Assembly Election 2024: राज्यात दिवाळीआधी किंवा दिवाळीनंतर विधानसभा निवडणूक होणार आहे. दिवाळीनंतरच निवडणूक होण्याची शक्यता अधिक आहे. लोकसभा निवडणुकीत बसलेल्या फटक्यानंतर राज्यात होणाऱ्या विधानसभेसाठी महायुती तयारीला लागली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी महायुतीचे जागावाटप खूप रखडलेले पाहायला मिळालं. त्यामुळे उमेदवारांची घोषणा, कोणाला कोणती जागा यात वेळ गेला. त्याचा फटका महायुतीला बसला. मात्र आता जागावाटप लवकर मार्गी लावायचे असे महायुतीने ठरवल्याचे दिसते आहे. येत्या १० दिवसांत महायुतीचे जागावाटप पूर्ण होण्याची शक्यता आहे, त्याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाष्य केले आहे.
काल नागपुरात महायुतीची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित होते. त्यासह भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल देखील उपस्थित होते. या बैठकीत जागावाटपावर चर्चा झाली असल्याचा अंदाज आहे. दरम्यान या बैठकीत भाजपला जास्त जागा देण्याबाबत चर्चा झाली आहे. मात्र कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार यावर अजून निर्णय झालेला नाही.
जागावाटप निश्चित करण्यासाठी अजून २ ते ३ बैठकीच्या फेऱ्या होण्याची शक्यता आहे. जागावाटप करताना आमच्या मित्रपक्षांच्या देखील विचार केला चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. कोणता पक्ष कोणती जागा जिंकण्याची क्षमता राखतो, त्यानुसार ती जागा त्याच्याकडे असे जगावपाचे सूत्र असणार आहे. महायुतीने काल झालेल्या बैठकीत जवळपास १७३ जागांवर एकमत झाल्याची चर्चा आहे. तर उर्वरित ११५ जागांवर अजून निर्णय होणे बाकी असल्याचे समजते आहे.
महायुती जागावाटप (फोटो- ट्विटर)
लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसला. जागावाटप करण्यासाठी झालेला उशीर हे प्रभाव होण्यामागचे मुख्य कारण मानले जात आहे. दरम्यान जागावाटपावरून रस्सीखेच पाहायला मिळत आहे. कागलची जागा राष्ट्रवादीकडे जाणार असल्याची शक्यता असल्याने भाजपच्या समरजित घाटगे यांनी तुतारी वाजवण्याचा निर्णय घेतला. तर इकडे इंदापूरात देखील हर्षवर्धन पाटील निवडणूक लढविण्यास उत्सुक आहेत. मात्र ही जागा अजित पवारांकडे गेल्यास हर्षवर्धन पाटील कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गेल्या दोन विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. यंदा देखील विधानसभा निवडणुकीत भाजप मोठा भाऊ असणार आहे. सर्वात जास्त जागा हा भाजप लढविण्याची शक्यता आहे. कदाचित भाजप १४० ते १५०, शिवसेना ७० आणि राष्ट्रवादी काँग्रेस ६० जागा लढवतील अशी शक्यता वर्तविली जात आहे. मात्र अंतिम जागावाटप १० दिवसांमध्ये जाहीर करू असे बावनकुळे यांनी सांगितले आहे. त्यामुळे कोण किती जागा लढविणार हे तेव्हाच स्पष्ट होणार आहे.