कल्याणमध्ये नागरिकांनी हक्काच्या घरासाठी आमरण उपोषण केलं आहे. चिकणघर येथील शांतिदूत सोसायटीच्या सभासदांचे विकासकाच्या विरोधात आमरण उपोषण केलं आहे. रहिवाश्यांना फसवणाऱ्या घोटाळेबाज शितोळे बिल्डर व त्याचा पार्टनर चेतन सराफ तसेच त्यांना साथ देणाऱ्या सोसायटीतील सभासद शिवाजी बागवे आणि नवाब तडवी यांच्यावर तात्काळ अटकेच्या कारवाईची मागणी केली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या तात्काळ कारवाईच्या आदेशानंतरही ठाणे पोलीस आयुक्त कारवाई का करत नाहीत, त्यांच्यावर कुणाचा दबाव आहे? असा सवाल माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केला आहे.
शांतीदूत गृहनिर्माण सोसायटीच्या पुनर्विकासाच्या कामात घोटाळा करणाऱ्या आणि राहिवाश्यांची दिशाभूल करणाऱ्या अवंती ग्रुप एल एल पी चे विकासक श्रीकांत शितोळे आणि चेतन सराफ यांच्या विरोधात तात्काळ कारवाईचे आदेश असतानाही पोलीस प्रशासनाकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्याच्या निषेधार्थ भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली शांतीदूत सोसायटी रहिवाशांनी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे.
याबाबत अधिक माहिती देताना माजी आमदार नरेंद्र पवार म्हणाले की, तीन वर्षांत घरे बांधून देण्याचे आश्वासन दिले आणि आज १४ वर्षे उलटून गेल्यानंतरही त्यांना घरे बांधून दिली नाहीत. तसेच येथील रहिवाश्यांना अंधारात ठेऊन त्यांची जमीन चुकीच्या पद्धतीने बँकेकडे गहाण ठेऊन त्यावर ३१८ कोटी रुपयांचे कर्ज घेतले. हे प्रोजेक्ट दाखवून त्या आधारे ४०० जणांची बुकिंग घेतली. त्या ४०० लोकांच्या बुकिंगच्या लोनच्या हप्त्याच्या माध्यमातून जवळपास १५० कोटी रुपये विकासक श्रीकांत शितोळे व त्यांच्या भागीदाराच्या खात्यात जमा झाले. आज 14 वर्षे उलटून गेल्यानंतरही आजतागायत त्याने इमारत बनवून दिली नाही.
३१८ कोटी व बुकिंगचे १५० कोटी म्हणजे एकूण ४६८ कोटी रुपयांचा घोटाळा या विकासकाने केलेला आहे. या विकासकाने येथील रहिवाश्यांची फसवणूक केली, बँकेची फसवणूक केली. म्हणून आमची मागणी आहे की, विकासक श्रीकांत शितोळे व त्यांचे सहकारी चेतन सराफ यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांना तात्काळ अटक केली जावी तसेच त्यांना साथ देणाऱ्या सोसायटीतील सभासद शिवाजी बागवे आणि नवाब तडवी यांना सुद्धा तात्काळ अटक केली जावी. जोपर्यंत त्यांच्यावर कारवाई होत नाही, येथील राहिवाश्यांना न्याय मिळणार नाही, तोपर्यंत आमरण उपोषण असेच सुरू राहणार आहे, असा इशारा माजी आमदार नरेंद्र पवार यांनी दिला.
पवार पुढे म्हणाले की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आम्ही आमचे निवेदन दिले, तेव्हा त्यांनी स्वतः ठाणे पोलीस आयुक्तांना फोन केला व तात्काळ कारवाईचे आदेश दिले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील यावर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्याला आज बरेच दिवस उलटून देखील ठाणे पोलीस आयुक्तांनी आजतागायत त्यावर कारवाई केलेलीं नाही, त्यासाठी त्यांचा जितका निषेध करावा तितका थोडाच आहे. मुख्यमंत्री व ग्राहमंत्र्यांचे ऐकत नाहीत, उपमुख्यमंत्र्यांचे ऐकत नाहीत, पोलीस प्रशासनावर एवढा कोणता दबाव आहे, असा सवाल नरेंद्र पवार यांनी या प्रसंगी उपस्थित केला.म