
'लेटलतीफ' कर्मचाऱ्यांना डेप्युटी सीईओंचा दणका
अमरावती : कार्यालयात येण्या-जाण्याची वेळ निश्चित करून दिलेली असताना याला फाटा देत सोमवारी (दि.21) जिल्हा परिषद कार्यालयात उशिरा येणारे 56 लेटलतीफ कर्मचारी पकडण्यात आले. या सर्व लेटलतीफ कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाने कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत. कार्यकारी अधिकारी संजिता महापात्रा यांच्या मार्गदर्शनात सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बालासाहेब बायस यांनी ही कारवाई केली.
शासकीय कार्यालयात कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना शासनाने कार्यालयात येण्या-जाण्यासाठीची वेळ निश्चित करून दिलेली आहे. पाच दिवसांचा आठवडा लागू केल्यापासून शासनाने शासकीय कार्यालयात येण्यासाठीची वेळ सकाळी 9.45 वाजता आहे आणि घरी जाण्यासाठीची वेळ सायंकाळी 6.15 वाजताची आहे. असे असताना सोमवारी जिल्हा परिषद मुख्यालयातील विविध विभागांत कार्यरत असलेल्या 56 कर्मचाऱ्यांनी शासकीय कार्यालयात येण्याच्या 9.45 वाजेच्या गाठले.
दरम्यान, सीईओंच्या मार्गदर्शनात सामान्य प्रशासन विभागाचे डेप्युटी सीईओ बायस यांनी विविध विभागांत कार्यरत असलेले हजेरी रजिस्टर आपल्या ताब्यात घेतले. या हजेरी रजिस्टरची तपासणी केली असता यामध्ये जिल्हा परिषद मुख्यालयातील विभागांमधील 56 कर्मचारी लेटलतीफ असल्याचे आढळून आले.
कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ
डेप्युटी सीईओंनी विविध विभागांतील कर्मचाऱ्यांचे सकाळी 10 वाजता हजेरी रजिस्टर ताब्यात घेतल्याची चर्चा पसरताच लेटलतीफ कर्मचाऱ्यामध्ये एकच खळबळ उडाली. दरम्यान, लेटलतीफ आढळून आलेल्या 56 कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे डेप्युटी सीईओ बालासाहेब बायस यांनी दिली.
विभागनिहाय लेटलतीफ कर्मचारी संख्या वाढली
आरोग्य विभाग 9. ग्रामीण पाणीपुरवठा 5. नरेगा 1. वित्त विभाग पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग 5. बांधकाम विभाग 8. बांधकाम उपविभाग क्र.२ मध्ये 7, पशुसंवर्धन विभाग 3, सिंचन विभाग 2. जलसंधारण उपविभाग 3. समाजकल्याण विभाग 4 अशा प्रकाराने 11 विभागांत 56 कर्मचारी लेटलतीफ आढळून आले.