
सह्याद्रीच्या सभेत घोषणाच घोषणा; 15 मिनिटांत सभा गुंडाळली; ठरावावेळी घोरपडे-कदम समर्थकांची घोषणाबाजी
मसूर : सह्याद्रीच्या ५६ वर्षांच्या इतिहासात प्रथमच वार्षिक सर्वसाधारण सभेच्या व्यासपीठावर घोषणांच घोषणा झाल्या. अन् अवघ्या काही मिनिटांत सभेचे वातावरण तापले ! माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजलीचा ठराव सुरू असतानाच आमदार मनोज घोरपडे व आमदार धैर्यशील कदम यांच्यासह समर्थक सभास्थळी दाखल झाले. त्यानंतर सुरू झालेल्या घोषणाबाजीला बाळासाहेब पाटील समर्थकांनीही प्रत्युत्तर दिल्याने सभागृहात तणावाची स्थिती निर्माण झाली.
हात जोडून शांततेचे आवाहन करूनही घोषणांचा आवाज थांबला नाही…अखेर अजेंडा क्रमांक १ ते ९ आवाजाच्या मतदानाने मंजूर करून अवघ्या १५ मिनिटांत सभा गुंडाळण्याची वेळ आली. “सह्याद्रीच्या इतिहासातील हा काळाकुट्ट दिवस,” अशी खंत व्यक्त करीत चेअरमन बाळासाहेब पाटील यांनी सभा समाप्त झाल्याचे जाहीर केले.
“आमदार मनोज दादांचा”, “आमदार धैर्यशील कदम यांचा विजय असो”, “मनोज दादा, “धैर्यशील दादा तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है”, अशा घोषणा विरोधकांकडून देण्यात आल्या. त्याला प्रत्युत्तर म्हणून “वाघ आहे वाघ आहे, सह्याद्रीचा वाघ आहे”, “चेअरमन बाळासाहेबांचा विजय असो”, अशा घोषणा पाटील समर्थकांकडून देण्यात आल्या. घोषणांच्या या प्रतिघोषणांनी सभास्थळी काही काळ वातावरण चांगलेच तापले.
यावेळी बाळासाहेब पाटील यांनी वारंवार हात जोडून शांतता राखण्याचे वज्ञ सभेचे कामकाज सुरळीत होऊ देण्याचे आवाहन केले. मात्र, घोषणाबाजी सुरूच राहिल्याने सभेच्या कामकाजात व्यत्यय निर्माण झाला. कार्यकारी संचालक विश्वजीत शिंदे यांनी अजेंड्यावरील विषयांचे वाचन केले. त्यानंतर पाटील यांनी अजेंडा क्रमांक १ ते ९ सभासदांसमोर मांडून ते मंजूर आहेत का, अशी विचारणा केली. सभासदांनी आवाजाच्या मतदानाने सर्व विषय मंजूर केले. त्यानंतर सभा समाप्त झाल्याचे जाहीर करण्यात आले.
सभा संपवताना बाळासाहेब पाटील यांनी, “सह्याद्रीच्या इतिहासात आजपर्यंत असा प्रकार कधी घडला नव्हता. सह्याद्रीच्या इतिहासातील हा काळाकुट्ट दिवस आहे,” अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. दरम्यान, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात ठेवली. त्यामुळे घोषणाबाजीच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
बाळासाहेब पाटील यांनी सभेनंतर आपली भूमिका स्पष्ट करताना सह्याद्रीची वार्षिक सर्वसाधारण सभा कायदेशीर व नियमानुसारच झाल्याचे सांगितले. प्रत्येक सभासदाला सभेची नोटीस देण्यात आली होती. विरोधकांनी सादर केलेल्या प्रश्नांसह सभासदांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तयार होती. काही प्रश्नांची उत्तरे सभेतच देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक सभासदाला प्रश्न विचारण्याचा आणि आपली मागणी मांडण्याचा अधिकार आहे. प्रश्न विचारण्यासाठी सभेत नेहमीप्रमाणे माईकची व्यवस्था करण्यात आली होती, असेही त्यांनी स्पष्ट केले.
“सभा दुपारी दोन वाजता ठरल्याप्रमाणे सुरू झाली. विरोधक उशिरा आले. मी स्वतः हात जोडून शांतता राखण्याचे आवाहन केले. मात्र घोषणाबाजी सुरू राहिल्याने सभेचे कामकाज पुढे नेणे शक्य झाले नाही,” अशी भूमिका पाटील यांनी मांडली. विरोधकांना सभा चालवायची नव्हती आणि केवळ विरोधासाठी विरोध करण्याचा प्रयत्न झाला, असा आरोपही त्यांनी केला.
याउलट आमदार मनोज घोरपडे व आमदार धैर्यशील कदम यांनी स्वतंत्र प्रति-सभा घेत सह्याद्रीची ५६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा बेकायदेशीर असल्याचा दावा केला. सदर सभा रद्द करून नव्याने वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. याबाबत संबंधित विभागाकडे दाद मागणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
विरोधकांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी सभेपूर्वीच कारखाना प्रशासनाला आपण सभेला उपस्थित राहणार असल्याची माहिती दिली होती. कारखान्याच्या प्रश्नांवर सभासदांच्या वतीने चर्चा करण्यासाठी ते आले होते. मात्र, बोलण्यासाठी माईक उपलब्ध करून देण्यात आला नाही, त्यामुळे आपला आवाज दाबण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप त्यांनी केला.
सभासदांना मोफत साखर देण्याची योजना का बंद करण्यात आली, मृत सभासदांच्या वारसांच्या नोंदी अद्याप का झालेल्या नाहीत आणि कारखान्याचा दुसरा युनिट इतरांकडून का चालविण्यात येत आहे, असे तीन प्रमुख प्रश्न उपस्थित करण्यात येणार असल्याचे विरोधकांनी …