
तामिळनाडूत जोसेफ विजय सरकार येणार अडचणीत? मित्रपक्षांनी सोडली मुख्यमंत्र्यांची साथ
चेन्नई : तामिळनाडूमध्ये थलपती विजय यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर धोका निर्माण झाल्याची चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्या नेतृत्वाखालील सरकारला त्यांच्याच मित्रपक्षांनी धक्का दिला आहे. राज्यात 6 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या विधानसभा पोटनिवडणुकांपूर्वी सीपीआय आणि सीपीएमने स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे.
पोटनिवडणुकीत डाव्यांची साथ सुटल्यानंतर आता विधानसभेतही टीव्हीकेच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आगामी पोटनिवडणुकीत सीपीआय धारापुरम मतदारसंघातून, तर सीपीएम मदुरंतकम मतदारसंघातून आपले उमेदवार रिंगणात उतरवणार आहे. दोन्ही पक्षांनी स्पष्ट केले की, ते टीव्हीकेच्या नेतृत्वाखालील कोणत्याही निवडणूक आघाडीचा भाग नाहीत. इतकेच नव्हे, तर सीपीएमचे ज्येष्ठ नेते पी. षणमुगम यांच्या वक्तव्यामुळेही विजय यांची चिंता वाढली आहे.
षणमुगम यांनी म्हटले की, विजय सरकारला पूर्ण पाच वर्षे पाठिंबा मिळेल की नाही, हे सरकारची धोरणे, निर्णय आणि जनतेप्रती असलेल्या त्यांच्या भूमिकेवर अवलंबून असेल. यापूर्वी मुख्यमंत्री विजय यांनी आघाडी मजबूत करण्याच्या उद्देशाने बैठक बोलावली होती. मात्र, डाव्या पक्षांनी या बैठकीवर बहिष्कार टाकला. सीपीएमचे षणमुगम म्हणाले की, टीव्हीकेला या बैठकीत नवी आघाडी तयार करायची होती.
काही निर्णयांमुळेही डावे पक्ष नाराज
मिळालेल्या माहितीनुसार, विजय यांना भावी पंतप्रधान म्हणून प्रोजेक्ट केले जात असल्याने मित्रपक्षांमध्ये अस्वस्थता आहे. याशिवाय विद्यापीठांमधील राजकीय घडामोडी आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनांबाबत विजय सरकारने घेतलेल्या निर्णयांमुळेही डावे पक्ष नाराज आहेत. टीव्हीकेने काही दिवसांपूर्वी एक आदेश जारी करून विद्यार्थ्यांना विविध आंदोलनांमध्ये सहभागी होण्यावर निर्बंध घातले होते. मात्र, वाद वाढल्यानंतर हे परिपत्रक मागे घेण्यात आले.
दरम्यान, गुजिलिअम्पराई येथे एका तहसीलदाराने कम्युनिस्ट पक्षाच्या सदस्यांची माहिती गोळा केल्याच्या वृत्ताने या वादात आणखी भर पडली आहे. विजय यांच्या ‘फिल्मी अंदाजा ‘वरूनही डावे पक्ष नाराज आहेत. विधानसभेत दररोज होणाऱ्या नाट्यमय वादविवादांनंतर डाव्यांचा आरोप आहे की, विजय यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा राजकीय आखाडा बनत चालली आहे आणि जनतेचे खरे प्रश्न बाजूला पडत आहेत.