गृहकर्ज, कार लोन स्वस्त होणार का? वाचा... काय म्हटलंय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी...
गृहकर्ज आणि कार लोन स्वस्त होण्याची वाट पाहणाऱ्या लोकांची थोडी निराशा होऊ शकते. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी व्याजदरात कपातीबाबत मोठे वक्तव्य केले आहे. सध्या व्याजदर कमी करणे घाईचे आणि अतिशय जोखमीचे आहे, असे ते म्हणाले आहे. त्यामुळे डिसेंबरमध्ये रेपो दरात कपात होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या महिन्याच्या सुरुवातीला आरबीआयने आपल्या पतधोरणात रेपो दरात कपात केलेली नव्हती. अशातच आता पुन्हा एकदा शक्तीकांत दास यांनी हे वक्तव्य केल्याने, व्याजदर कपातीची शक्यता पुर्णत: मावळली आहे.
डिसेंबरमध्ये व्याजदर कमी होण्याची होती शक्यता
आरबीआय डिसेंबरमध्ये आपल्या पतधोरणात समितीच्या बैठकीनंतर रेपो दरात कपात करू शकते, असे मानले जात होते. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची (एमपीसी) बैठक डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. एमपीसीची बैठक दर दोन महिन्यातून एकदा होते. परंतु, रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरच्या १८ ऑक्टोबरच्या वक्तव्यानंतर डिसेंबरमध्ये व्याजदरात घट होण्याची शक्यता धुसर झाली आहे.
दर का कमी केले गेले नाहीत?
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी म्हटले आहे की, आम्ही निर्णय घेण्यात मागे नाही. भारताच्या विकासावर कोणताही परिणाम झालेला नाही. भारताचा विकास दर ७.२ टक्के राहीलच. विकास दर कायम आहे, महागाई देखील कमी होत आहे, तरीही काही धोके आहेत. त्यामुळे व्याजदरात कपात करणे घाईचे आणि जोखमीचे ठरेल, असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, महागाई कमी होण्याची शक्यता आहे, पण त्याच्या दृष्टीकोनात काही मोठे धोके देखील आहेत, असे दास मुंबईतील एका कार्यक्रमादरम्यान म्हटले आहे.
महागाई आटोक्यात आणण्यावर भर
रिझर्व्ह बँकेने ऑक्टोबरच्या सुरुवातीला सादर केलेल्या पतधोरणात रेपो दरात बदल केलेला नसला, तरी पतधोरणाबाबतची भूमिका बदलली. त्यांनी आपली भूमिका बदलून ‘विड्रॉल ऑफ अॅकॉमोडेशन’ ऐवजी ‘न्यूट्रल’ अशी केली. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी किरकोळ महागाई नियंत्रणात आणण्यावर आपला भर राहील, असे यापूर्वीच स्पष्ट केले होते.