
फोटो सौजन्य - Social Media
स्थानिक समर्थ कृषी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (रासेयो) युनिटच्यावतीने ‘वीर बाल दिवस’ विविध उपक्रमांच्या माध्यमातून उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने सिनगाव जहागीर येथील जनता माध्यमिक शाळेत विद्यार्थ्यांसाठी विविध जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास जनता माध्यमिक शाळेचे प्राचार्य प्रा. लांबे व प्रा. मेहेत्रे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, शौर्य आणि त्यागाची भावना निर्माण व्हावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता. त्यासाठी निबंध स्पर्धा, प्रश्नमंजुषा, वीर बाल जनजागृती फेरी तसेच कथाकथन स्पर्धा घेण्यात आल्या. या सर्व उपक्रमांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
हे उपक्रम समर्थ कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन मेहेत्रे आणि उपप्राचार्य प्रा. देवानंद नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या राबविण्यात आले. दरवर्षी २६ डिसेंबर रोजी ‘वीर बाल दिवस’ साजरा केला जातो. हा दिवस गुरु गोविंद सिंगजी यांचे सुपुत्र साहिबजादा जोरावर सिंगजी व साहिबजादा फतेह सिंगजी यांच्या अद्वितीय बलिदानाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो.
या प्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा. योगेश चगदळे यांनी कथांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शौर्य, त्याग आणि बलिदानाचे महत्त्व प्रभावीपणे समजावून सांगितले. लहान वयातही देशासाठी दिलेल्या सर्वोच्च बलिदानाचे उदाहरण देत त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरित केले.
कार्यक्रमादरम्यान प्राचार्य प्रा. लांबे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “देशाच्या उज्ज्वल भविष्याचा पाया घडविण्यासाठी वीर बाल दिवसासारख्या उपक्रमांची अत्यंत गरज आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती, नैतिक मूल्ये आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण होते.” या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. सचिन सोळंकी आणि प्रा. अरुण शेळके यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच रासेयो स्वयंसेवकांनी नियोजनबद्ध पद्धतीने सहभाग घेत कार्यक्रम यशस्वी केला. ‘वीर बाल दिवस’ निमित्ताने राबविण्यात आलेले हे उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, त्यागाची भावना आणि आदर्श मूल्ये रुजविण्यास उपयुक्त ठरले असून, अशा उपक्रमांमुळे शालेय व महाविद्यालयीन स्तरावर राष्ट्रभक्तीचा संदेश प्रभावीपणे पोहोचतो, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.