
Reasi Terror Attack News Marathi : जम्मू-काश्मीरमधील रियासीमध्ये रविवारी (10 जून) संध्याकाळी ६.१५ वाजता भाविकांना घेऊन जाणाऱ्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. यामध्ये ड्रायव्हर आणि कंडक्टरसह 10 जणांचा मृत्यू झाला, तर 41 जण जखमी झाले. दिल्लीत पंतप्रधान मोदींच्या शपथविधी सोहळ्याच्या एक तास आधी हा हल्ला झाला. दरम्यान हा हल्ला होण्यापूर्वीचा एक व्हिडीओ समोर आला. तसेच जम्मू-काश्मीरमधील रियासी येथे भाविकांच्या बसवर गोळीबार करणारे दहशतवादी हे विदेशी असल्याचं स्पष्ट झालं असून अबू हमजा आणि अधुन अशी त्यांची नावं आहेत. या दोघांचं छायाचित्र सुरक्षा दलाने जाहीर केलं आहे.
या व्हिडीओमध्ये बस कटराच्या दिशेने जाताना दिसत आहे. मात्र काही वेळातच या बसवर हल्ला होतो. तसेच दहशतवादी बसवर अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात करतात. मात्र बसचा चालक प्रसंगावधान दाखवून ही बस घटनास्थळापासून दूर नेण्याचा प्रयत्न करतो. मात्र याच घटनेदरम्यान त्यालाही गोळी लागते. त्यामुळे बसवरील त्याचं नियंत्रण सुटून ही बस रस्त्याच्या कडेला असलेल्या दरीत जाऊन कोसळली. मात्र ड्रायव्हरने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे बसमधील अनेक प्रवाशांचे प्राण वाचले. तसेच त्यापैकी अनेकजण केवळ किरकोळ जखमी झाले. ड्रायव्हरने प्रसंगावधान दाखवलं नसतं तर मोठा नरसंहार घडला असता.
रियासीचे एसएसपी मोहिता शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, कांडा भागातील शिव खोडीहून कटरा येथे जाणाऱ्या बसवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. ज्यामध्ये चालक जखमी झाला आणि त्याचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे 53 सीटर बस खड्ड्यात पडली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी दोन दहशतवादी होते. तसेच अतिरेकी महामार्गावर बसची वाट पाहत होते. या बसमधील प्रवासी जम्मू-काश्मीरच्या बाहेरचे असल्याने त्यांनी या बसला लक्ष्य केल्याचे दिसते. या घटनेमागे पाकिस्तानी दहशतवादी संघटनांचा हात असल्याचे मानले जात आहे.
जखमी प्रवासी संतोष कुमार यांनी सांगितले की, दहशतवाद्यांनी लष्कराचा गणवेश परिधान केला होता. त्याचे तोंड लाल कपड्याने बांधले होते. वळणावर बस येताच अचानक गोळीबार सुरू झाला. बस खड्ड्यात पडण्यापूर्वी दहशतवाद्यांनी 25 ते 30 गोळ्या झाडल्या होत्या.
शोध मोहिमेत ५ पथके, एनआयएही तपासात गुंतले
या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना जम्मू-काश्मीरच्या एलजीने 10 लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. त्याचबरोबर जखमींना ५० हजार रुपयांची मदतही दिली जाणार आहे. जखमींच्या मदतीसाठी घटनास्थळाजवळ नियंत्रण कक्षही उभारण्यात आला आहे. घटनास्थळी पोलीस, लष्कर आणि सीआरपीएफचे संयुक्त तात्पुरते सुरक्षा दल तयार करून हल्लेखोरांना पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शोध मोहिमेसाठी पाच स्वतंत्र पथकेही तयार करण्यात आली आहेत. तपासासाठी एनआयएचे पथकही घटनास्थळी पोहोचले आहे.
मृतांमध्ये २ वर्षाच्या मुलाचाही समावेश
मृत्युमुखी पडलेल्या १० जणांमध्ये बस चालक विजय कुमारचाही समावेश आहे. वृत्तानुसार, हल्लेखोरांनी आधी त्याला लक्ष्य केले. तो रियासी जिल्ह्यातील रहिवासी होता. याशिवाय कटरा येथील बस कंडक्टर अरुण कुमार यांचाही मृत्यू झाला आहे. याशिवाय जयपूरचे रहिवासी राजेंद्र सैनी (42), त्यांची पत्नी ममता सैनी (40), राजेंद्रचा मोठा भाऊ ओमप्रकाश यांची मुलगी पूजा सैनी (30) आणि पूजाचा मुलगा लिवंश उर्फ किट्टू (2) यांचाही मृत्यू झाला आहे. हे सर्वजण एकाच कुटुंबातील होते. याशिवाय उत्तर प्रदेशातील बलरामपूर येथील रहिवासी रुबी, अनुराग आणि दिल्लीतील रहिवासी सौरभ गुप्ता यांचाही मृत्यू झाला आहे.
बस पडल्यानंतरही दहशतवाद्यांनी गोळीबार सुरूच
सोमवारी एका जखमी प्रवाशाने घटनेची संपूर्ण माहिती दिली. तो म्हणाला, मी दर्शनासाठी गेलो होतो. काही लोकांनी गोळीबार केला. यानंतर बस खड्ड्यात पडली. माझ्यासमोर अनेक जण जखमी झाले. मला वाटतं तिथे २-३ लोक होते. माझ्या मुलाने बसवर मागून हल्ला करणाऱ्या एका व्यक्तीला पाहिले होते. त्याचवेळी आणखी एका सूत्राने सांगितले की, बस पडल्यानंतरही दहशतवाद्यांनी गोळीबार केला. बस दुपारी चार वाजता सुटणार होती, पण ती साडेपाच वाजता सुटली.
तीन दशकांत दुसऱ्यांदा हल्ला
जम्मू-काश्मीरमध्ये तीन दशकांतील हा दुसरा हल्ला आहे. यापूर्वी 10 जुलै 2017 रोजी अनंतनागमध्ये अमरनाथ यात्रेदरम्यान दहशतवाद्यांनी बसवर गोळीबार केला होता. यामध्ये 7 भाविकांना प्राण गमवावे लागले. त्याचवेळी 19 जण जखमी झाले.