
Reasons for BJPs Victory : भाजपला तीन राज्यांत घवघवीत यश मिळाले आहे. यावरून आता प्रसिद्ध राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी सखोल विश्लेषणासह कारणे सांगितली आहेत. भाजपने नुकत्याच झालेल्या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत उत्कृष्ट कामगिरी केली. चारपैकी तीन राज्यांमध्ये बहुमत मिळवत भाजपने काँग्रेसला नमवले आहे.
भाजपाच्या विजयाचे विश्लेषण
भाजपने काँग्रेसच्या ताब्यात असलेली दोन राज्ये (राजस्थान आणि छत्तीसगड) हिरावली आहेत. तर, मध्य प्रदेशमधील आपली सत्ता कायम राखली आहे. प्रत्येक व्यक्ती, राजकीय जाणकार, पत्रकार आणि विश्लेषक भाजपाच्या विजयाचे किंवा काँग्रेसच्या पराभवाचे विश्लेषण करीत आहेत. राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांनीदेखील या निकालावर त्यांचे मत व्यक्त केले आहे.
मते मिळण्याची चार प्रमुख कारणे
प्रशांत किशोर यांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले, तुम्हाला कोणालाही हरवायचे असेल तर तुम्हाला त्याची ताकद माहिती असणे आवश्यक आहे. तुम्ही भाजपविरोधात लढत आहात तर मग तुम्हाला माहिती असले पाहिजे की लोक भाजपाला मत का देतात? तुम्ही जोवर त्यांची ताकद जाणून घेत नाही, त्यांच्यापेक्षा उत्तम काही करीत नाही तोवर लोक तुम्हाला मत देणार नाहीत. भाजपला केवळ मोदींच्या नावावर मते मिळत नाहीत. भाजपला लोकांची मते मिळण्याची चार प्रमुख कारणे आहेत.
या मुद्द्यांवर भाजपला मिळाली मते
प्रशांत किशोर म्हणाले, भाजपच्या विजयाचे पहिले कारण म्हणजे हिंदुत्व. भारतीय समाजातला एक मोठा वर्ग आहे जो हिंदुत्वाशी बांधला गेला आहे. या वर्गाचा भाजपच्या हिंदुत्वावर विश्वास आहे. त्यामुळे ते भाजपाला मत देतात. भाजपची दुसरी ताकद म्हणजे नवा राष्ट्रवाद. तुम्ही हल्ली ऐकत असाल की भारत आता विश्वगुरू बनतोय, पंतप्रधान मोदी यांनी जगभरात भारताची शान वाढवली आहे, भारतात जी-२० सारखी परिषद होते, पुलवामाचा दहशतवादी हल्ला तुम्हाला आठवत असेल, लोकांनी पुलवामाच्या नावावर भाजपला मते दिली होती. राष्ट्रवादाची भावना निर्माण करून भाजपाला लोकांची मतं मिळवता येतात.
भाजपची जमेची बाजू
राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर म्हणाले, भाजपाच्या विजयाचं तिसरं कारण म्हणजे, योजनांचे लाभार्थी, ज्यांना सरकारच्या वेगवेगळ्या योजनांचा लाभ मिळतो, लोकांना शौचालय बांधून दिलं जाते, शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ मिळतो, घर बांधून मिळतं किंवा थेट पैसे मिळतात, हे लाभार्थी सरकारची कृपा विसरत नाहीत. मग ते भाजपला मत देतात. भाजपाची चौथी जमेची बाजू म्हणजे त्यांची पक्षसंघटना आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ.
भाजपाची संघटना मजबूत आहे. तसेच आर्थिक स्तरावर ते मजबूत आहेत. उदाहरणार्थ तुम्ही राष्ट्रीय जनता पार्टीकडून निवडणूक लढत असाल तर तुम्हाला निवडणुकीच्या तिकीटासाठी पक्षाला पैसे द्यावे लागतील. परंतु, तुम्ही जर भाजपकडून निवडणूक लढत असाल तर पक्षच तुम्हाला पैसे देतो. या चार कारणांमुळे भाजप प्रत्येक निवडणुकीत जिंकतेय. काँग्रेसला जर भाजपाविरोधात जिंकायचं असेल तर या चार गोष्टींवर काम करावे लागेल.