
महाबळेश्वर : अंबेनळी घाटासह (Ambenali Ghat) तालुक्यातील सावर्जनिक बांधकाम विभागाकडील प्रमुख रस्त्यांसाठी डिसेंबरमध्येच ६३ कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार मकरंद पाटील (Makrand Patil) यांनी कुंभरोशी येथील एका कार्यक्रमात बोलताना दिली. यावेळी पंचायत समितीचे सभापती संजय गायकवाड उपस्थित होते.
जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या भूस्खलनात तालुक्याचा पश्चिम भाग विशेषतः किल्ले प्रतापगड पंचक्रोशीतील २२ गावेही होरपळलेली होती. अंबेनळी घाटासह या भागातील प्रमुख रस्ते, पुल, शेती, घरे, जनावरे यांचे मोठे नुकसान झाले होते. अतिवृष्टीमुळे रस्ते वाहून गेल्याने या भागाचा जगाशी संपर्क तुटला होता. मकरंद पाटील यांनी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांशी संपर्क करून महाबळेश्वर तालुक्यातील २२ गावे ही रायगड जिल्ह्याच्या संपर्कात आणण्यात यश आले. परंतु अनेक दिवस रस्त्याअभावी या भागाचा सातारा जिल्ह्याशी संपर्क तुटला होता.
जुलै महिन्यात मकरंद पाटील यांनी एक आठवडा महाबळेश्वर येथे तळ ठोकून नुकसानग्रस्त भागाचा दौरा करून ग्रामीण भागातील लोकांना दिलासा दिला. याच भागातील अंबेनळी घाटासह विविध प्रमुख रस्त्यासाठी तातडीने प्रस्ताव पाठवून निधीची मागणी करण्यात आली होती. ही मागणी डिसेंबरमध्येच शासनाने मान्य केली होती. शनिवारी (दि.२२) मकरंद पाटील यांनी महाबळेश्वर तालुक्याच्या पश्चिम भागाचा दौरा केला. प्रतापगड पंचक्रोशील २२ गावात विकास कामांचे भूमिपूजन करून त्यांनी आपल्या विकास कामाचा धमाका उडवून दिला.