एक काळ असा होता की, बालगंधर्वांचं नाटक म्हणजे हमखास हाऊसफुल्ल गर्दी. नंतर गद्य नाटकांच्या जमान्यात डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्या नावाभोवती अशीच जादू होती आणि आता त्याजागी – प्रशांत दामले आणि भरत जाधव ! दोघांभोवती असणारे ग्लॅमर त्यांच्या वाढत्या वयातही तरुणाईला लाजविणारं सिद्ध होतय. दोन पिढ्यांच्या रसिकांच्या मनात त्यांचे अढळपद हे कायम आहे.
आज या दोघांची आठवण येण्यामागे खास कारण आहे. ते म्हणजे त्यातील भरत जाधव याने गेल्या शनिवारी म्हणजे मावळत्या वर्षात त्याच्या ‘सही रे सही’ नाटकाचा चक्क चारहजार चारशे प्रयोगांचा विश्वविक्रम केलाय. नागपूरात डॉ. वसंतराव देशपांडे नाट्यगृहात सलग दोन दिवस दोन प्रयोग ‘सही’चे झाले आणि नेहमीप्रमाणे त्याला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसादही मिळाला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या विक्रमाबद्दल भरतचे खास अभिनंदनही केल. असो.
‘सही रे सही’ नाटकाच्या १५ ऑगस्ट २००२ रोजी झालेल्या शुभारंभी प्रयोगापासून नाट्यसमीक्षक म्हणून साक्षीदार राहाण्याचे भाग्य लाभलय. रंगमंचावर आणि विंगेतूनही अनेक घटनांमध्ये उपस्थिती आहे. या नाटकाच्या पडद्यामागल्या गोष्टींवर एखादी कादंबरी होऊ शकेल. येवढे नाट्य त्यात गच्च भरलेले आहे. गेली एकविस वर्ष हे नाटक आणि त्यातील अभिनेता भरत जाधव हा रसिकांपूढे ठामपणे उभा आहे. हाही एक विक्रमच म्हणावा लागेल.
‘सही रे सही’ या नाटकाशी संबंधित काही किस्से या निमित्ताने आठवले. त्यातील काहींना उजाळा.
१५ ऑगस्ट २००२ हा दिवस. प्रयोग जाहीर झालेले. केदार शिंदे आणि भरत हे पक्के दोस्त. महाराष्ट्राची लोकधारापासून दोघांचं ट्युनिंग मस्त जमलेलं. निर्मात्या लताबाई नार्वेकर यांच्या श्री चिंतामणीतर्फे हे नाटक रंगभूमीवर आणण्यासाठी सारी मोर्चेबांधणी झालेली. शेवटची रंगीत तालीम बघण्यासाठी लताबाई पुण्यात हॉलवर पोहचल्या. त्यांनी पूर्ण नाटक बघितले. तालमीपूर्वी झालेल्या नाचामुळे भरत पूर्ण थकलेला. काही केल्या नाटक रंगत नव्हते. ही बाब लताबाईंच्या नजरेत आली आणि त्यांनी ‘शुभारंभी प्रयोग करण्याजोगं नाटक झालेलं नाही. पुढे ढकलणं उत्तम. असा प्रयोग करणे योग्य नाही!’ असा निर्णय दिला आणि सारेजण निराशच झाले. अखेर केदारने उद्याच्या तालमीनंतर निर्णय घेऊ! अशी सूचना केली. रात्रभर चक्रे फिरली. शुभारंभी प्रयोग रद्द झाला तर नाटकही रंगभूमीवर येणं मुश्कील बनेल, अशी चर्चा झाली. दुसरा दिवस उगवला. सारी टिम सज्ज झाली. लताबाईपुढे प्रयोग सादर झाला. तो पाहून बाई खूष आणि शुभारंभी प्रयोग १५ ऑगस्टला झाला, जो महाविक्रमी प्रयोगांचा मानकरी ठरलाय.
पांढरेशुभ्र कपडे परिधान करणारे ज्येष्ठ रंगधर्मी अशोक मुळ्येकाका म्हणजे नाट्यसृष्टीत पडद्याआड संचार असलेले अजब व्यक्तिमत्त्व. त्यांच्याबद्दल साऱ्यांनाच आदराची भावना. मुळचे व्यवस्थापक असलेले मुळ्ये काका कलाकारांच्या मदतीसाठी कायम धावून जाणारे. त्यांचे एकसे बढकर एक असे कल्पक उपक्रम आजवर नाट्यसृष्टीने अनुभवले आहेत. त्यांच्या हस्ते नाटकाच्या मुहूर्ताचा नारळ हा वाढविण्यात आलाय. भविष्यात पारंगत असणाऱ्या लताबाईनी मुहूर्ताचा दिवस वेळ हा देखिल आग्रहपूर्वक निश्चित केला होता आणि बुकींगवर चमत्कार घडला. उभी नाट्यसृष्टी चक्रावून गेली. ‘सही’ प्रमाणे कथानक असणारी अनेक नाटके रंगभूमीवर आली. काही व्यावसायिक, प्रायोगिक, हौशी मंडळींनीही याच प्रकारे नाटके सादर करण्याचा प्रयत्न केला पण ‘मूळ’ ‘सही’ची बरोबरी कुणी करु शकले नाही. त्याच्या उंचीपर्यंत कुणालाही पोहचता आले नाही, हेच खरे!
‘सही रे सही’ची जन्मकथाही नाटकासारखी नाट्यमय. ‘श्री चिंतामणी’ संस्थेसाठी ‘विजय दीनानाथ चव्हाण’ हे नाटक रंगभूमीवर आल. केदारचं दिग्दर्शन त्याला होतं. पण नाटक म्हणावं तेवढं चाललं नाही. उलट बुकींगचा तक्ता प्रयोगागणित घसरत चाललेला. आता पुढे काय हा प्रश्न केदार आणि भरत पूढे होता. ‘फसलेलं नाटक’ हा शिक्का बसलेला. एकेदिवशी केदारच्या घरी भरतला ‘गलगलेची नक्कल करायला सांगितलं. मित्रांमध्ये, पिकनिकला ही नक्कल अगदी ठरलेलीच आणि नव्या नाटकाची चक्रे फिरली. ‘जिप्सी’मध्ये लताबाईंसोबत भेट झाली. ज्या ‘जिप्सी’त मोहन वाघ याचं टेबल कायम बुक असायचं. तिथेच नाटकाचे कथानक पहिल्यांदा बाहेर आलं. टेबलवरल्या ‘पेपर नॅपकिन’वर नेपथ्य, कथानक टिपलं गेलं! आणि नाटक करायचं हा निर्णय लताबाईंनी दिला. तेव्हा स्क्रीप्ट चक्क बारा पानांची होती. सारंकाही इम्प्रोवायझेशन! पहिला अंक झाला; पण दुसरा अंक आकाराला येण्यासाठी एमडी कॉलेजच्या समोर असलेल्या ‘सर्वोदय’हॉटेलमध्ये जावं लागलं. तिथं पुढे प्रसंग झाले आणि तालमी सुरू झाल्या!
मंगेश कुलकर्णी म्हणजे जाहिराती, हेडींगमधला बापमाणूस! नाटकाचं नाव काय असावं हे ठरलेलं नव्हतं. उलट-सुलट चर्चा सुरु झाल्या. ‘कॅची’ नाव असावं यावर एकमत. मंगेशने ‘सही सही’ असे नाव दिलं. से ‘टुरटुर’ प्रमाणे चालेल अस त्याला वाटलं. पण त्यात काहीतरी वेग, गती नाही असं भरत म्हणाला. ‘रे’ हा शब्दमध्ये टाकून अखेर ‘सही रे सही’ हे बारसे करण्यात आलं. आणि त्यानंतर ‘सही’ने मागे वळून पाहिले नाही. ‘पंचाक्षरी’ नाव म्हणून ‘लकी’ ठरले.. जे लताबाईंनीही मान्य केलं.
‘३६५ दिवसात ५६७ प्रयोग करणारे सही रे सही हे नाटक’ म्हणून विक्रमांच्या यादीत याची नोंद झालीय. तसेच आजवर श्रीचिंतामणी, सुयोग आणि आता भरत जाधव एंटरटेन्मेंट’ या तिन नाट्य संस्थेच्या मांडवाखालून नाटक गेलय. सगळीकडे भरत जाधव टिम कायम आहे. या नाटकाने नाट्यसंस्थांना आर्थिक स्थैर्य दिले. तर दुसरीकडे कोर्टकचेरीपर्यंतही नाटक पोहचले होते. पण शेवट गोड! नाटक सुरुच राहीले.
‘सही रे सही’तला ‘गलगले’ ही व्यक्तिरेखा भन्नाटच. जी हसवता- हसविता पुरेवाट करते. त्या ‘गलबले’ची प्रेरणाकथाही भरतने एका मुलाखतीत मला सांगितली होती. पुण्यात एका प्रयोगानिमित्ताने भरत बालगंधर्व नाट्यगृहाजवळ पोहचला होता. चहाच्या टपरीवर भरत आणि त्याचे दोस्तलोक गप्पा मारत होते. एक माणूस रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करीत होता. तो ‘डावीकडे बघा, आता उजवीकडे बघा, चला रस्ता मोकळा झालाय. रस्ता ओलांडूया!’ असं स्वतःशीच बोलत होता. आणि भरत मधल्या अभिनेत्याला त्याची ही लकब आवडली. कुठेतरी याचा वापर करता येईल हे पक्के झाले. १९९४ साली हा माणूस त्याला दिसला आणि २००२ साली ‘सही’मध्ये प्रगटला! दरम्यान मित्रांमध्ये हे ‘गलगले’ फेमस झाले होते! पुढे ‘गलगले’वरुन केदारने पिच्चरही काढला! असे हे ‘गलगले’या व्यक्तिरेखेची जन्मकथा! शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि पुल देशपांडे या दिग्गजांनीही ‘गलगले’वर प्रेम केलं. या व्यक्तिरेखेबद्दल ते भरभरून बोलले आहेत. या भूमिकेचे, त्याच्या समीकरणाचे जाहीर कौतूकही त्यांनी केलय.
मराठीप्रमाणे अन्य भाषिकांनीही या नाटकावर भरभरून प्रेम केलय. भाषा जरी समजत नसली तरीही ‘हटके नाटक’ म्हणून परकीय मंडळींनीही नाटकाची मजा अनुभवली आहे. गुजराती रंगभूमीवर ‘अमे लई गया, तमे रही गया’ या नावाने याचे रुपांतर झालय. शर्मन जोशी यांनी प्रमुख भूमिका केलीय. ३५० प्रयोगाचा गुजराती रंगभूमीवर प्रथमच विक्रम त्यातून झालाय. हिंदी रंगभूमीवर ‘हम ले गये, तूम रह गये!!’ या शीर्षकाखाली ‘सही’ झालय. जावेद जाफरी यांची त्यात भूमिका होती. हिंदीतले प्रयोगही रसिकांनी डोक्यावर घेतले. ‘गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये सहीच्या प्रयोगांची यापूर्वीच नोंद झालीय. आचार्य अत्रे यांचे तो मी नव्हेच!, गंगाराम गवाणकर यांचे वस्त्रहरण आणि आता केदार शिंदे यांचे सही रे सही हे पाच हजार प्रयोगाचे मानकरी ठरत आहेत. नाबाद ४४०० प्रयोगांचा मानकरी म्हणून हे नाटक मराठी नाट्यसृष्टीत विक्रमांच्या वैभवावर पोहचले आहे. लवकरच पाच हजारांचा विक्रम निश्चितच होईल. नाबाद ४,४०० ‘सही’ धावा करुन गलगले निघाले! त्यांना शुभेच्छा!
– संजय डहाळे