आता नव्या लालपरीतून प्रवास होणार आणखी सुखद; बसमध्ये बिघाड झाल्यास...
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यात तब्बल १५ वर्षानंतर ३ बाय २ आसन व्यवस्थेसह ३००० नवीन, तांत्रिकदृष्ट्या प्रगत आणि आरामदायी बस खरेदी करण्याचा निर्णय एसटी प्रशासनाने घेतला आहे. या नव्या लालपरीच्या आगमनाने प्रवासाचा अनुभव डिजिटल आणि सुखकर होणार आहे.
एसटी विभागाला आतापर्यंत अशा बस प्राप्त झाल्या असून, येत्या काळात आणखी बस मिळण्याची शक्यता आहे. या बसमध्ये डिजिटल डॅशबोर्ड, सेन्सरयुक्त इंजिन, कॅमेरे, चार्जिंग पोर्ट्स आणि संगणक प्रणालीद्वारे बिघाड शोधण्याची सुविधा आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांच्या सोयी आणि सुरक्षिततेला प्राधान्य देत ३००० नवीन बस खरेदी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या बस थेट कंपनीकडून पूर्णपणे तयार केल्या जात असून, जुन्या पद्धतीप्रमाणे चेसिसवर बांधणी करण्याऐवजी आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज अशा बस महामंडळाला पुरवल्या जात आहेत.
हेदेखील वाचा : St Bus : नवीन वेळापत्रकानुसार कंपनीने ई-बसेसचा पुरवठा करावा, परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती
तसेच या बसच्या आगमनामुळे जुन्या बसमधील वारंवार बिघाड होण्याच्या तक्रारी कमी होण्याची अपेक्षा आहे. नव्या बसच्या डिझाईनमध्ये प्रवाशांच्या आरामाला आणि सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले आहे, ज्यामुळे प्रवासाचा अनुभव अधिक सुखकर होणार आहे.
3 बाय 2 आसन व्यवस्था
नव्या बसची सर्वात महत्त्वाची वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे त्यांची ३ बाय २ आसन व्यवस्था, गेल्या १५ वर्षांनंतर एसटी महामंडळाने पुन्हा एकदा या रचनेचा अवलंब केला आहे. वाढत्या प्रवासी संख्येचा विचार करता, ही आसन व्यवस्था अधिक प्रवाशांना सामावून घेण्यासाठी उपयुक्त ठरेल. या रचनेमुळे बसची प्रवासी क्षमता वाढली असून, गर्दीच्या वेळी प्रवाशांना बसण्यासाठी जागा मिळण्याची शक्यता वाढली आहे. आसनांची रचना आरामदायी असून, प्रवाशांना लांब पल्ल्याच्या प्रवासातही थकवा जाणवणार नाही.
तांत्रिक प्रगती आणि डिजिटल सुविधा
या नव्या बस तांत्रिकदृष्ट्या अत्यंत प्रगत आहेत. त्यामध्ये डिजिटल डॅशबोर्ड, सेन्सरयुक्त इंजिन आणि संगणक प्रणालीद्वारे बिघाड शोधण्याची सुविधा आहे. ज्यामळे बसमधील कोणताही तांत्रिक बिघाड थेट संगणक प्रणालीवर नोंदवला जातो, ज्यामुळे वेळेत दुरुस्ती करणे शक्य होते. यामुळे प्रवासातील विलंब टाळता येणार आहे आणि प्रवाशांना निर्धारित वेळेत गंतव्यस्थानी पोहोचता येईल.