
Nashik News: ‘फक्त दोन मिनिटे झाली, आत जाऊ द्या’; नाशिकच्या खड्ड्यांचा विद्यार्थ्यांना फटका, UPSC केंद्राबाहेर पालकांचा संताप
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) वतीने रविवारी NDA-NA II परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. नाशिक शहरातील १३ उपकेंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. के. व्ही. एन. नाईक महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर मात्र प्रवेशाच्या वेळेवरून मोठा गोंधळ निर्माण झाला. काही विद्यार्थी निर्धारित वेळेनंतर दोन ते तीन मिनिटांनी केंद्रावर पोहोचले. त्यांना प्रवेश नाकारण्यात आल्याने विद्यार्थ्यांनी केंद्राबाहेरच साकडे घालत प्रवेश देण्याची विनंती केली.
शहरात रविवारी पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले होते. त्यातच रस्त्यांवरील खड्डे आणि वाहतूक कोंडीमुळे वाहतुकीचा वेग मंदावला होता. अनेक विद्यार्थी परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचण्यासाठी घरातून तासन्तास आधी निघाले होते. मात्र, रस्त्यातील अडथळ्यांमुळे त्यांना केंद्रावर पोहोचण्यास काही मिनिटांचा उशीर झाला.
के. व्ही. एन. नाईक महाविद्यालयाच्या केंद्राबाहेर प्रवेश नाकारल्यानंतर विद्यार्थ्यांनी बंद दरवाजासमोर प्रवेश देण्याची विनंती केली. ‘फक्त दोन मिनिटे झाली आहेत, आत जाऊ द्या’, अशी विनवणी विद्यार्थी करत होते. मात्र, नियमांचा हवाला देत त्यांना प्रवेश देण्यात आला नाही. परीक्षा केंद्राच्या दारापर्यंत पोहोचूनही परीक्षा देता न आल्याने काही विद्यार्थ्यांना अश्रू अनावर झाले.
या प्रकरणी निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत यांनी UPSCच्या नियमांनुसार परीक्षा सुरू होण्यापूर्वी ३० मिनिटे आधी प्रवेशद्वार बंद केले जाते, असे स्पष्ट केले. प्रवेशाची वेळ संपल्यानंतर कोणत्याही अधिकाऱ्याला शिथिलता देण्याचा अधिकार नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
मुलांना परीक्षा देता न आल्याने संतप्त पालकांनी परीक्षा केंद्राबाहेर प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. शहरातील खड्डे आणि वाहतूक कोंडीमुळे विद्यार्थ्यांना उशीर झाला असेल, तर त्याची शिक्षा विद्यार्थ्यांनी का भोगायची, असा सवाल पालकांनी उपस्थित केला. काही काळ परीक्षा केंद्राबाहेर तणावाचे वातावरण निर्माण झाले. संतप्त पालकांनी UPSCच्या परीक्षा निरीक्षकांची गाडी अडवण्याचाही प्रयत्न केल्याने गोंधळ वाढला.
सकाळी ९.३० वाजता रिपोर्टिंगची वेळ निश्चित करण्यात आली होती. त्यानंतर काही मिनिटांनी पोहोचलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आला. UPSC परीक्षेसाठी नियम आणि वेळेचे काटेकोर पालन आवश्यक असले, तरी शहरातील रस्त्यांची दुरवस्था, पावसामुळे साचलेले पाणी आणि वाहतूक कोंडी लक्षात घेऊन प्रशासनाने परीक्षा केंद्रांभोवती वाहतूक नियोजन केले होते का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. अवघ्या काही मिनिटांच्या विलंबामुळे विद्यार्थ्यांची परीक्षा हुकल्याने नाशिकच्या रस्ते आणि वाहतूक व्यवस्थेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.