
Pune News: गणेशोत्सवात तुकाराम मुंढेंचा जलवा; व्यंगचित्रातून भेसळखोरांना थेट इशारा!
रथावरील मोठ्या व्यंगचित्रात तुकाराम मुंढे यांच्या हातात भिंग दाखवण्यात आले असून, खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवण्याचा संदेश त्यातून देण्यात आला आहे. या पोस्टरवर ‘मला श्रींच्या नैवेद्यातही अजिबात भेसळ चालणार नाही’ असा ठळक संदेश देण्यात आला आहे. गणरायाच्या नैवेद्यात वापरल्या जाणाऱ्या पदार्थांमध्ये भेसळ होऊ नये, यासाठी नागरिकांनी जागरूक राहावे, असा या संदेशाचा उद्देश आहे.
गेल्या काही काळापासून तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली अन्न व औषध प्रशासनाकडून खाद्यपदार्थांमधील भेसळ तसेच मुदतबाह्य आणि बनावट औषधांविरोधात कारवाई केली जात आहे. त्यामुळे गणेशोत्सवातील सजावटीतून त्यांच्या कामाचा संदर्भ देत सामाजिक संदेश देण्याचा मंडळाने प्रयत्न केला आहे.
वीर हनुमान मित्र मंडळाने गणपती रथाच्या माध्यमातून धार्मिकतेसोबत सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. भेसळयुक्त पदार्थांपासून सावध राहणे, खाद्यपदार्थांची गुणवत्ता तपासणे आणि गणरायाला शुद्ध व सुरक्षित नैवेद्य अर्पण करणे, याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. त्यामुळे लक्ष्मी रस्त्यावरचा हा गणपती रथ आणि त्यावरील तुकाराम मुंढेंचे व्यंगचित्र चर्चेचा विषय ठरत आहे.