Pune News: पुणेकरांसाठी गुडन्यूज! खडकवासला धरण साखळीत पाणीसाठा वाढण्यास सुरूवात
पुणे: मान्सूनपूर्व पावसाची गेल्या दोन दिवसांपासूनच्या दमदार हजेरीमुळे खडकवासला धरण साखळीतील चार धरणांमध्ये पाणी वाढण्यास सुरूवात झाली आहे. दरवर्षी जूनच्या मध्यापासून या धरणांमध्ये पाणीसाठा वाढण्यास सुरूवात होते, मात्र या वर्षी २५ मेपासूनच धरणांमध्ये पाण्याची आवक सुरू झाली असून, २७ मेपर्यंत या चारही धरणांमधील पाणीसाठा हा ५.७४ टीएमसी इतका झाला आहे.
खडकवासला धरण साखळीतील टेमघर, पानशेत, वरसगाव व खडकवासला ही धरणे मागील वर्षी १०० टक्के भरली होती. मात्र यंदा मार्च आणि एप्रिल महिन्यात उन्हाचा कडका वाढल्याने, शहरात पाण्याची मागणी वाढली होती. परंतु, शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीत पहिल्यांदाच मे महिन्यातच वाढ होण्यास सुरुवात झाली आहे.
सोमवारी दिवसभर घाटमाथ्यासह, धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने पाणीसाठा वाढण्यास सुरुवात झाली. दरवर्षी मान्सूनच्या आगमनानंतर दहा ते बारा दिवस सलग पाऊस झाला तरच जूनच्या अखेरीस पाणीसाठा वाढण्यास सुरुवात होते. मात्र, यंदा अवकाळी पावसाने मान्सूनच्या आगमनाच्या पहिल्याच दिवशी पाणीसाठ्यात वाढ केली आहे.
एकट्या सोमवारी म्हणजे २६ मे रोजीच मान्सूनच्या आगमनाच्या पहिल्याच दिवशी या चारही धरणांमध्ये २८ एमएलडी पाण्याची वाढ झाली असल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली आहे. या चारही धरणांत १५० मिमी पेक्षा अधिक पाऊस झाल्याने २६ मे पासूनच पाणीसाठा वाढण्यास सुरुवात झाली आहे. रविवारी सायंकाळी या चारही धरणांचा पाणीसाठा ५.६६ टीएमसी होता. तर दिवसभरात महापालिकेचा शहराचा पाणी पुरवठा तसेच कालव्यातून दिवसभर पाणी सोडण्यात आल्यानंतरही हा पाणीसाठा आज सकाळी आठपर्यंत ५.७४ टीएमसी झाला आहे.
सोमवारी सकाळी आठ वाजल्यापासून आज म्हणजेच २७ मेच्या सकाळी आठपर्यंत खडकवासला धरण परिसरात १६ मिमी, पानशेत धरण परिसरात ९९ मिमी, वरसगाव धरण परिसरात ९२ मिमी तर टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ७० मिमी पावसाची नोंद झाली आहे. या चारही धरणांची उपयुक्त पाणीसाठवण क्षमता २९.५० टीएमसी आहे. या धरणातून शहरासह, जिल्ह्यातील पाणी पुरवठा योजना आणि सिंचना योजनांसाठी पाणी दिले जाते. त्यामुळे मागील काही वर्षांप्रमाणेच जून महिन्यातच कपात ओढावण्याची शक्यता होती. मात्र, यंदा मे महिन्यातच पाणी वाढण्यास सुरुवात झाली.
जलसंपदा विभागाच्या भीमा खोरे पुरनियंत्रण कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, भीमा खोर्यातील २६ धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची दमदार हजेरी आहे.
वीर धरण ४० टक्के भरले
वीर धरण पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे वीर धरण ४०.६५ टक्के भरले असून, धरणात उपयुक्त पाणीसाठा ३.८२ टक्के इतका आहे. गेल्यावर्षी याच तारखेला म्हणजे २७ मे रोजी १३ टक्के भरलेले होते. तर पावसाची शून्य टक्के हजेरी होती.