
अवकाळीने पंढरपूरातील शेतकऱ्यांचे मोडले कंबरडे
पंढरपूर : ऐन द्राक्ष छाटणीच्या महत्त्वाच्या टप्प्यात पंढरपुरात विशेषतः पंढरपूर तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे बळीराजावर अस्मानी संकट उभे ठाकले आहे. हातातोंडाशी आलेले पीके वाया जाण्याची भीती असल्याने शेतकरी हतबल झाला आहे. शासनाने या नुकसानीची तात्काळ दखल घेऊन मदत जाहीर करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
पंढरपूर तालुक्यातील सर्वच गावांमध्ये द्राक्ष छाटणीला जोर धरला होता. तयार झालेले पीक शेतातून सुरक्षित घरी आणण्यासाठी शेतकरी रात्रदिवस मेहनत घेत असताना अचानक कोसळलेल्या या अवकाळी पावसाने त्यांच्या कष्टावर पाणी फिरवण्याची वेळ आली आहे. उभे पीकेही पावसामुळे नुकसानग्रस्त होण्याची शक्यता असल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. पंढरपूरातील शेतकरी अनेक नैसर्गिक संकटांवर मात करत शेती करत आला आहे. मात्र, द्राक्ष छाटणीच्या हंगामातील हा पाऊस शेतकऱ्यांचे मोठे नुकसान करणारा ठरण्याची चिन्हे आहेत.
दरम्यान, अवकाळी पावसामुळे झालेल्या द्राक्ष पीक नुकसानीची शासनाने तातडीने दखल घ्यावी, पंचनामे करावेत आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी त्वरित आर्थिक मदत जाहीर करावी, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत. या अस्मानी संकटात शासनाकडून नेमकी काय मदत मिळणार, याकडे पंढरपुरातील सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
शेतकरी हतबल
गेले दोन दिवस कोसळलेल्या अवकाळी पावसाने द्राक्ष व भुसार पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. द्राक्ष पिकाला मोठ्या प्रमाणात पावसाचा तडाखा बसला आहे. द्राक्ष छाटणीला सुरू असतानाच पावसाने जोरदार हजेरी लावल्याने पंढरपूर तालुक्यासह द्राक्षपीक धोक्यात आले आहे. उभे पीक जमीनदोस्त झाले असून, सततच्या पावसाने या मका, बाजरी पिकाला कोब येऊन, नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. शेतातील पिके पावसात भिजून नुकसान झाले. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास डोळ्यांदेखत नुकसान होत असल्याचे पाहताना शेतकरी हतबल होत आहेत.
पावसाने केलं होत्याचं नव्हतं
तालुकाभरात गेले दोन दिवस मोठ्या प्रमाणात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळत आहे. गुरुवारी सकाळपासून पावसाने सुरुवात केली होती. या पावसाचा सर्वाधिक फटका द्राक्ष पिकाला बसला आहे. द्राक्ष पीक छाटणी योग्य बनले असून, बहुतांशी ठिकाणी छाटणी जोरात सुरू आहे. त्यातच पावसाने हजेरी लावल्याने द्राक्ष शेतीचे नुकसान झाले आहे. कासेगाव, करकंब, तनाळी, शेटफळ, खर्डी, शिरगाव, अनवली, गादेगाव, भाळवणी, पिराचीकुरोली, पुळूज आदी पंचक्रोशीत तसेच अन्य भागात उभे द्राक्षपिक जमीनदोस्त झाले आहे.
हवामान बदलाचा पिकांवर परिणाम
यंदाच्या हंगामात हवामान बदलामुळे आणि अतिवृष्टीमुळे द्राक्ष शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. तसेच, हंगामपूर्व झालेल्या पावसामुळे पेरु आणि डाळींबाचेही मोठे नुकसान झाले आहे. या हवामान बदलामुळे भविष्यात द्राक्ष, जांभूळ, आंबा यांसारख्या फळझाडांचेही नुकसान होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. अशा परिस्थितीत कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना तातडीने मार्गदर्शन करण्याची आणि झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची नितांत गरज आहे, अशी मागणी शेतकरी करत आहेत.