
फोटो सौजन्य AI
खासदार म्हस्के म्हणाले की, सध्या रोज उबाठा नेत्यांची आणि त्यांनी पाळलेल्या पोपटांची टिवटिव सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हाबाबत अजून पूर्ण सुनावणी झालेलीच नाही, तरीही उबाठा गटाचे नेते अर्धवट माहितीच्या आधारे जी काही टिवटिव करत आहेत, ती अत्यंत हास्यास्पद आहे, असा टोला खासदार म्हस्के यांनी लगावला.
संजय राऊत, असीम सरोदे आणि त्यांच्या कच्च्याबच्च्यांचं एक नवीनच ‘घटनापीठ’ तयार झालं आहे. चॅनलच्या माईकसमोर ते त्यांचा स्वतंत्र खटला चालवत आहेत. हे स्वतःलाच न्यायमूर्ती समजून रोज टीव्हीवर बसून जजमेंट द्यायला लागले आहेत. यांच्या बुद्धीची कीव करावी तेवढी थोडीच आहे, असे खासदार म्हस्के म्हणाले.
खासदार म्हस्के म्हणाले की, ईडी आणि सीबीआयची नोटीस द्यायची असती तर उद्धव ठाकरेंना आणि आदित्य ठाकरेंना का नाही दिली. केवळ संजय राऊत यांनाच दिली होती. आपला पक्ष का संपतोय याचे त्यांनी कधीतरी आत्मपरीक्षण करायला हवे, असे सल्ला खासदार म्हस्के यांनी दिला. निवडणूक आयोगाने त्यांच्या अधिकारात निर्णय घेतले आहेत.
निवडणूक आयोगाने यांच्या बाजूने निर्णय दिला नाही म्हणून त्यांच्यावर टीका करत आहेत. आता खटला लांबणीवर पडावा, यासाठी सात न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे प्रकरण सोपवण्याची ते मागणी करतात. कारण त्यांना पराभव डोळ्यांसमोर दिसत आहेत. निकालानंतर पराभव झाला की हे रडायला मोकळे, सकाळी भुंकायला मोकळे, अशी घणाघाती टीका खासदार म्हस्के यांनी केली.
ते पुढे म्हणाले की, उबाठा गटाला आतून पक्की जाणीव झाली आहे की, त्यांची बाजू कायदेशीरदृष्ट्या अत्यंत लंगडी आणि तोकडी आहे! जेव्हा आमचे आदरणीय वकील न्यायालयात उभे राहतील, तेव्हा उबाठाचा सर्व पोकळ युक्तिवाद धडाधड खोडून काढला जाईल आणि त्यांचे दात त्यांच्याच घशात जातील,
असे खासदार म्हस्के म्हणाले. ते पुढे म्हणाले की, आमचा न्यायव्यवस्थेवर आणि संविधानावर पूर्ण विश्वास आहे. जनतेच्या न्यायालयात शिवसेना कोणाची हे आधीच सिद्ध झालं आहे आणि घटनापीठासमोरही ते सिद्ध होईल, असे खासदार म्हस्के म्हणाले. शिवसेनेचे सर्व आमदार, खासदार आणि लाखो कार्यकर्ते खंबीरपणे उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी आहेत. त्यामुळे निकाल शंभर टक्के कायदेशीर बाजूने आणि शिवसेनेच्याच म्हणजेच एकनाथ शिंदेंच्या बाजूने लागेल, असा विश्वास खासदार म्हस्के यांनी यावेळी व्यक्त केला.